९क्ष वाहिनीवरील या महाभारताची सुरूवातच केली गेली ती द्यूत आणि द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगापासून. कदाचित महाभारतातील हा सर्वात हॉट भाग असल्याने इथून सुरूवात केली असेल. निमिष सांगतात त्यातही तथ्य आहे. एक स्त्री म्हणून एकता कपूर यांना हा प्रसंग आधी दाखवावा असे वाटले असेल. पण एकता कपूर यांच्या मालिका आणि एक चित्रपट क्या कूल है हम पाहिल्यावर त्यांना स्त्री बद्दल कितीसा आदर आहे हे कळून चुकते. आधीचे सत्यवती/गंगा/शांतनू /भीष्मप्रतिज्ञा हे महत्वाचे भाग फ्लॅश बॅक ने दाखवणार हे उघड आहे.
पण प्रथम ग्रासे मक्षिकापात: झाला आहे. एकताच्या सास बहू मालिकेप्रमाणॆच कालचा भाग अत्यंत बटबटीत, उथळ आणि नाटकी वाटला. एकही व्यक्तिरेखा धड जमली नाही. आधीच्या महाभारतापेक्षा काहीतरी वेगळे दाखवण्याचा अट्टाहास दिसून आला. द्रौपदी झालेली अभिनेत्री सरळ सरळ सास बहूच्या सेटवरून उचलून आणल्यासारखी आधुनिक दिसत होती. पांडव झालेले फॅशन परेड मध्ये रॆंप वर चालणारे मॉडेल वाटत होते.
द्रौपदी तर तारस्वरात सतत किंचाळत होती. काय बोलतेय ते धड ऐकू येत नव्हते. कृष्णाने वस्त्र पुरवण्य़ाचा प्रसंग हा तर या प्रसंगातील परमोच्चबिंदू. पण तोही चक्क विनोदी करून टाकला. द्रौपदी कृष्णाचा "सखा सखा" म्हणत धावा करत असताना कुठूनसे सुदर्शन चक्र भिरभिरत येते. ते पाहून सर्वजण भयचकित होतात. सुदर्शनचक्र अखेर त्या द्यूतगृहात खूप उंचीवर एखाद्या यु. एफ. ओ. च्या उडत्या तबकडीप्रमाणे स्थिर होते आणि त्यातून सेम टू सेम द्रौपदीने नेसलेले लालभडक वस्त्र पाझरू लागते. महाभारताचा नायक अर्थातच श्रीकृष्ण असल्याने कॄष्णाची भूमिका कोणता कलावंत करतो यावरही मालिकेचे यश अबलंबून असते. चोप्रांच्या महाभारतात नितीश भारद्वाज कृष्ण म्हणून शोभला होता. तर रामानंद सागरच्या कॄष्णा मध्ये सर्वदमन बॅनर्जी विशेष प्रभाव टाकू शकला नाही. का कोण जाणे पण त्याला एवढी लिपस्टीक लावतात की त्याचे तोंड कायम पान खाऊन रंगल्यासारखे दिसते.
९क्ष च्या महाभारतात कृष्ण कोण हे त्यांना एवढ्यात उघड करायचे नसणार म्हणून त्यांनी कृष्णाऐवजी सुदर्शनचक्र दाखवले असावे. कहानी हमारे महाभारतकी असे क कारी शीर्षक जरी दिले तरी ही मालिका फारशी तग धरू शकेल असे वाटत नाही.