"ह्या सर्वांत ना राज ठाकरेंना मराठी प्रेम आणि ना जया बच्चन ह्यांना हिंदी प्रेम."

जया बच्चनचे हिंदी प्रेम किती खरे अथवा खोटे हे माहिती नाही. आपण दर्शवून दिलेले काँग्रेस व सपा ह्याचे राजकारण तसे असेलही. हे पक्ष आतापर्यंत असले राजकारणच करत आलेले आहेत. पण ह्यात राज ठाकरेही सामिल आहेत असे म्हणणे चुकिचे वाटते. राज ह्यांची भूमिका पटण्यास मराठी बांधवांना कसलीही हरकत नसावी. आतापर्यंतचा त्यांचा इतिहास निव्वळ राजकारणाच्या खेळी खेळण्याचे आहे, असे दिसून आलेले नाही. तेव्हा तथाकथित मराठी विचारवंतांनी  (म्हणजे अगदी सगळेच मराठी, प्रत्येकच अगदी थोर विचारवंत वगैरे-- मीही अपवाद नाही) आपापल्या विचारांच्या तलवारी म्यान करून त्यांच्यामागे उभे राहणे शहाणपणाचे ठरेल. त्यांना संधी दिली पाहिजे, हे महत्त्वाचे.

जयाबाई हे अगदी आपण म्हणता तशी एक राजकारणी खेळी म्हणून मुंबईत उघडपणे म्हणतात, व परत मानभावीपणे माफी मागून मोकळ्या होतात, हे जर असे खरे असले, तरीही त्याचा मराठी बांधवांनी नीट विचार करावा. हे असेच इतक्याच सहजपणे त्या कलकत्यात अथवा चेन्नईमध्ये करण्यास धजावल्या नसत्या, ह्याबद्दल तरी मराठी विचारवंतांत दुमत नसावे.म्हणजे निव्वळ संधिसाधू राजकारणाची खेळी खेळतांना त्यांना समोरचा मराठी माणूस अगदी नगण्य वाटला... "टेकन फॉर ग्रँटेड... " हे काय दर्शवून जाते बरे? असे जर असले, तर त्यातून हेच दिसते की मराठी माणसांची उगाच नको तेव्हढा उदार, सर्वंकश वगैरे विचार करण्याच्या व आपापसात भांडणे करत बसण्याच्या संवयींची  त्यांनी व त्यांच्यामागील इतरांनी पुरेपूर दखल घेतली आहे. आता हे दुष्टचक्र आपण मोडायला हवे, त्यासाठी नव्या दमाच्या राज ह्यांच्यामागे उभे राहावे.