माझ्या मनातीलच विचार अपण इथे मांडले आहेत.
चॅनलवाले तर असंवेदनशील आहेतच हो.. पण भक्तांचं काय?
अनंत चतुर्दशीच्या एक दिवस आधी देशाच्य़ा राजधानीत इस्लामी अतिरेक्यांनी ५ भीषण बाँबस्फोट घडवून आणले आणि २५ निरपराध्यांना ठार केले. ११ जुलै २००६ च्या मुंबईत झालेल्या स्फोटानंतर जशी मुंबई दुसऱ्याच दिवशी सावरली तशी दिल्ली पण सावरली. लगेच सलाम दिल्लीचे नारे ऐकवून झाले.
पण वाटलं होतं की अनंत चतुर्दशीच्या मिरवणूकीत या दु:खद संकटाचे थोडे तरी प्रतिबिंब दिसेल. पण कसचे काय? जणू काही घडलेच नाही अशा थाटात ढोल, ताशे वाजवत हे भक्तगण नाचत होते, फटाके उडवत होते, आनंदात बुडून गेले होते. दिल्लीतील स्फोटांचे त्याना काहीही सोयरसुतक नव्हते.
देवाचे कार्य आणि भक्ती म्हटली की तिथे काहीही आड येऊ द्यायचे नाही असा जणू शिरस्ताच पडून गेलाय. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक कोणत्याही शहरातील मिरवणूकीमध्ये गांभीर्य नव्हते. सुतकी वातावरण नको पण थोडीतरी माणूसकी शिल्लक ठेवा.. पण नाही.. दगडाच्या देवापुढे आता आम्हाला स्वधर्मीयांच्या जीवाची किंमतही शून्य वाटू लागली आहे. दुसरीकडे गणरायाला म्हणे जड अंत:करणाने निरोप दिला जात होता. साश्रू नयनांनी म्हणे लोक विसर्जन करून परतत होते. पाहा.. मातीच्या.. छे.. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तिसाठी लोकांना भावनावेग अनावर होतोय.. पण जिवंत माणसे जिथे दगड झाली त्यांच्यासाठी मात्र या भक्तांच्या मनात बिलकूल ओलावा दिसला नाही. "शो मस्ट गो ऑन" हे जरी खरे असले तरी दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली जरी वाहिली असती तरी खूप झाले असते पण एवढीही औपचारिकता पाळाविशी एकाही सार्वजनिक गणेशोत्स्व मंडळाला वाटले नाही.
खरंच हे सर्व उबग आणणारे आहे.