खगोल शास्त्रज्ञांनी ज्योतिषाद्वारे चांद्रयान सोडण्याचा मुहूर्त जर खरंच शोधला असेल तर हा एक मोठाच मूर्खपणा समजला पाहिजे आणि म्हणूनच याची शक्यताही फारच कमी वाटते.  माझ्या मते तरी श्रीहरीकोटा भागातल्या किंवा आंध्र प्रदेशातल्या ज्योतिषांनी आपला धंदा चालावा म्हणून ही उठवलेली ही एक आवई असावी.  त्याच प्रमाणे यानाची प्रतिकृती करून ती अर्पण करण्याचं कामही शास्त्रज्ञांनी नाही तर भलतंच कुणीतरी केलं असणार किंवा नुसतीच अफवा असणार. 

बार्ट बॉक नावाचा एक थोर डच खगोल शास्त्रज्ञ होऊन गेला.  चाळीस वर्षं तो हार्वर्ड विद्यापीठात खगोलशास्त्राचा प्राध्यापक होता. त्याचं खगोलशास्त्रातलं संशोधन वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरवलं गेलं होतं. बार्ट बॉक आणि १८६ इतर शास्त्रज्ञांनी (यात १८ नोबेल पुरस्कार विजेते होते) मिळून १९७५ मध्ये 'द ह्युमॅनिस्ट'च्या सप्टेंबरच्या अंकात एक निवेदन प्रसिद्ध केलं होतं, ज्याचं शीर्षक होतं 'ऑब्जेक्शन टु ऍस्ट्रॉलॉजी'.  या निवेदनात या शास्त्रज्ञांनी निर्विवादपणे ज्योतिष हे एक शास्त्र नसून भंपकपणा आहे असं सांगितलं होतं. हे निवेदन पुढे जगभर खूप प्रसिद्ध झालं.  हे संपूर्ण निवेदन ह्युमॅनिस्टच्या साईट्वर  दुवा क्र. १ या दुव्यावर वाचता येईल आणि प्रत्येक विचारी माणसासाठी उदबोधक ठरू शकेल.