सर्वांचे मनःपुर्वक आभार.

अमृत,
तुमचे प्रश्न अनुत्तरीत राहणे साहजिक आहे पण तरीही त्यांची माझ्या माहितीनुसार उत्तरे द्यायचा प्रयत्न करते.
माझ्या डोळ्याला काय झाले होते याचे खरे कारण कोणालाच माहिती नाही. अगदी निरामयचे डॉक्टर असो वा देशपांडेकाका, त्यांनाही माहिती नाही. माझ्या अल्पमतीनुसार आमच्या कारशेजारून गेलेल्या काळीपिवळीच्या टायरमध्ये अडकलेला दगड सुटून माझ्या डोळ्यावर बसला असावा असे वाटते पण तो गुन्हेगार दगड कारमध्ये सापडला नाही आणि माझ्या डोळ्यावर टप्पा खाऊन तो परत रस्त्यावर पडला असेल हे जरा अतीच वाटते तरीही. माझ्या डोळ्याची गोटी खोबणीच्या बरीचशी बाहेर असल्याने दगड वगैरे माझ्या डोळ्याला अगदी सहजी फोडू शकतात, त्यामुळे मलातरी तेच कारण जास्त संयुक्तीक वाटतेय पण पुरावा नसल्याने गप्प बसणे भाग पडले. श्रीच्या मते राजकारण करून घेऊन (?! ) मी खिडकीशेजारची जागा मिळवणे योग्य नसल्याने मला शिक्षा मिळाली असण्याची दाट शक्यता प्रत्यक्षात अवतरली होती. बाबांच्या मते मी त्या दिवशी सुंदर ( हे म्हणजे खर्रंच कैच्याकैच ! ) दिसत असल्याने माझ्यावर 'मूठ मारल्या'चा प्रकार झाला. बाबांचा जबरदस्त विश्वास असलेल्या एका राजस्थानी ज्योतिष्याच्या मते असे होणार हे माझ्या कुंडलीतच लिहिलेले होते आणि त्यात भर पडली ती त्यावेळी केतू माझ्यावर खासाच रूष्ट होता ( माझ्या लाख विरोधाला न जुमानता त्याची शांती करून घेतली गेली ! ). आता यातले जे मत तुम्हाला आवडत असेल तेच खरे कारण होते असे तुम्ही समजू शकता.

पीएचडी की भलीमोठ्ठी जबाबदारी? आज इतक्या वर्षांनी मागे वळून पाहून या प्रश्नाला उत्तर द्यायचे म्हणजे मजेशीर वाटते आहे. सीएमआय इन्स्टीट्यूटमध्ये गणिताची पीएचडी करायची माझी खटपट वाया गेली आणि मग त्यातून मनच उडून गेले. नोकरीत चांगल्या संध्या येत गेल्या आणि मागे वळून पहायची गरज पडली नाही. माझी ता(/भा?!)ईगिरी बऱ्यापैकी चालत असल्याने 'भलीमोठ्ठी जबाबदारी' मी आजवरतरी यशस्वीरित्या टाळलेली आहे आणि पुढेही टाळतच राहिन.