केदार मी आधी म्हटल्याप्रमाणे हा चर्चेचा प्रस्तावच असा आहे की यावर भरपूर चर्चा होऊ शकेल. आता तुझ्या प्रश्नांची माझ्या मतानुसार (आणि मतिनुसार) उत्तरं.
१. एकक किंमतीचा मुद्दा अधिक स्पष्ट करावा.
आज व्यवहार होताना प्रत्येक वस्तूची एकक किंमत हा त्या व्यवहाराचा पाया असतो. म्हणजे उदाहरणार्थ एका संगणकाची एकक किंमत २५,००० रुपये असते म्हणून आपण तो घेताना तेवढे पैसे देतो आणि संगणक आपल्या मालकीचा होतो. पण समजा माझी आंब्याची बाग आहे आणि मला संगणक घ्यायचाय, तर मूळात संगणक विक्रेता आंबे आणि संगणक यांचा विनिमय करायला तयार होईल का आणि झाल्यासही आंब्यांच्या संदर्भात संगणकाची एकक किंमत कशाच्या आधारावर ठरवणार?
२. मुळातच, वस्तूविनिमय काही प्रमाणातच यशस्वी होईल. पैशांची शंभर टक्के जागा वस्तू घेऊ शकणार नाही.
मान्य. पैशाची शंभर टक्के जागा वस्तू घेउच शकत नाहीत. आणि वस्तू विनिमय काही प्रमाणातच करायचा म्हटला तर विशिष्ट प्रमाणात वस्तू विनिमय आजही होतो. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे रशियाच्या विघटनाच्या पूर्वी भारत रशियाकडून शस्त्र आणि सैन्याला लागणारी इतर सामग्री मोठ्या प्रमाणात खरेदी करायचा. त्यावेळी आपल्याकडे परकीय चलनाचा तुटवडा असल्यामुळे हा व्यवहार वस्तू विनिमयात व्हायचा. (आणि म्हणूनच रशियाच्या विघटनाच्या वेळेस आअल्याकडच्या बऱ्याच निर्यातदारांना मोठा फटका खावा लागला होता.)