खरंच आहे. आपल्या नेत्यांच्या सुमारपणालाच काही सुमार नाही.
हल्ल्यानंतरची ही सर्व परिस्थिती इतकी लाजिरवाणी आहे की बोलता सोय नाही. मुख्यमंत्री बदलाच्या वातावरणात ही वेळ का आली आहे याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झालेय. राण्यांना तर पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या भुताने एव्हढे झपाटलेले होते की मुंबईवर हल्ला झाला होता हेच ते विसरले होते की काय अशी शंका यावी.
मात्र खरी गोची होते ती माझ्यासारख्या परदेशी काम करणाऱ्या अनेक लोकांची. हल्ल्यानंतरच्या दिवशी माझ्यावर प्रश्नांचा एव्हढा भडिमार झाला. अतिरेकी असे खुलेआम घुसलेच कसे? मुंबईची सुरक्षाव्यवस्था खरंच एव्हढी बेगडी आहे काय? असे आणि अशासारखे अनेक. बीबीसी वर तर अखंड बातम्या देणे चालू होते. आपल्या देशाचे असे वस्त्रहरण पुर्वी कधीच झाले नसेल. पोलीसांकडची जुनाट हत्यारे, खुद्द कमांडोंचा नवशिकेपणा, राजकीय परिस्थिती यावर लेख छापले जात होते. जे काही दाखवले जात होते त्यात अभिमानास्पद असे खचितच काही नव्हते.
मला तर एका ब्रिटिश मित्राने विचारले देखिल (मी काही वर्षं मुंबईत राहत होतो हे ठाउक असल्याने) की तुझा भारतात परत जाण्याचा विचार अजुनही पक्का आहे काय? तो प्रश्नं डोक्यात वादळ उठवून गेला.
कधी कधी वाटतं, आपल्या देशाला एका क्रांतीची गरज आहे!