हल्ल्यानंतरच्या दिवशी माझ्यावर प्रश्नांचा एव्हढा भडिमार झाला. अतिरेकी असे खुलेआम घुसलेच कसे? मुंबईची सुरक्षाव्यवस्था खरंच एव्हढी बेगडी आहे काय?

मुंबईची सुरक्षा व्यवस्था कितीही चांगली असती तरीही हे हल्ले झालेच असते. ९/११ चे हल्ले ढिसाळ सुरक्षे मुळे झाले का? चांगल्या सुरक्षेमुळे नुकसान थोडे कमी झाले असते एवढेच! हल्लेखोरांची तयारीच इतकी जबरदस्त होती, त्याचा अंदाज न आल्यामुळे आपण आपले ३ मोहरे एका झटक्यात गमावले.

आभाळं फाटल्यावर ठिगळं कुठे कुठे लावणार ? ते आभाळ का फाटलं याचा शोध घ्यावा लागेल. आपण कितीही मजबूत सुरक्षा केली तरी जिथे कुंपणच शेतं खातयं तिथे कशाची सुरक्शाव्यवस्था ?

अतिरेक्यांना देशांतर्गत मदत  होती हे नक्कीच! हळू हळू ही माहीती बाहेर येईल, (कदाचीत येणार ही नाही, त्याचीच खरे म्हणजे जास्त भीती वाटते!!) कायद्याचा धाक आहे का कोणाला? नादान आणि मस्तवाल राजकारण्यांना कोण आवरणार? राण्यांना मुंबईच्या चीतेवर आपल्या मुख्यमंत्रीपदाची पोळी भाजायची होती! रानातले लांडगे सुद्धा यापेक्षा जास्त माणसुकीने वागतील पण यांची वखवख संपायची नाही.

पण शिशूपालाचे/ रावणाचे देखील शंभर अपराध भरलेच की!

शेवटी या देशातील अत्याचार, अन्याय या देशातील सामान्यांनीच तर संपवला आहे, मग ती रामाची वानर सेना असेल , विक्रमादीत्याने मातीतून उभे केलेले सैनिक असतील, महाराजांचे रांगडे मावळे असतील अथवा त्या अर्धनग्न फकीराच्या मागे धावणारी अडाणी भारतीय जनता असेल, हा प्रश्न आपल्यालाच सोड्वायचा आहे... राज्यकर्त्याना नाही, तो त्यांचा प्रश्नच नाही, त्यांनी अशा प्रश्नांकडे लक्ष दिले तर राहुलच्या , रितेशच्या आणि नीलेश च्या करीअरचे काय?

लोकशाहीत शस्त्रे बदलली आहेत आणि सुदैवाने भारतात अजून ही लोकशाही आहे,त्याचे परीणाम दिसतात,दिसले आहेत.( ती आहे म्हणून तर मनोगत वर आपण इतक्या मोकळेपणाने चर्चा करता येते!)

राजकारणी सर्व शक्तीमान नाहीत, याच भारतीयांनी आणिबाणीची अन्यायी राजवट मतपेटीद्वारे बदलली होती.आताही ते करता येईल. सुजाणपणे मतदान करून आपण त्यांचा माज उतरवू शकतो. त्यांना आपली भीती वाटली पाहीजे. आपण सर्वांनी ठरवले तर हे होऊ शकते. बाजू पलटल्यावर हिंदी सिनेमातील क्रूर खलनायक नाही का लाचार होत दयेची भीक मागत?

आपण प्रत्येकाने या पार्श्वभूमीवर एक संकल्प करू या - मी मतदान करणार. माझे नांव मतदारांच्या यादीत असेलच याची खात्री करणार. अहो, आपण १० रुपायची भाजी सुद्धा चांगली आहे की सडलेली बघून घेतो, मग ज्यांच्या हातात आपले ३०% उत्पन्न जाणार त्यांना पारखून घ्यायला नको का? का ते कुणाही गुंडाला द्यायचे?

तुझा भारतात परत जाण्याचा विचार अजुनही पक्का आहे काय? तो प्रश्नं डोक्यात वादळ उठवून गेला.

या हल्ल्यामुळे भारतात परत यावे की नाही हा व्यक्तिगत प्रश्न आहे, त्याचा संबंध मानसिकतेशी आहे, बाह्य परीस्थितिशी तितकासा नाही. आज जगाच्या पाठीवर तुम्ही कोठेच सुरक्षीत नाही. अतिरेक्यांना नेमके हेच तर हवे आहे, नाही का? लढणाऱ्या हातामागे कणखर मन असावं लागतं, तरच युद्धे जिंकता येतात.