अष्टावधान हा मूळचा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ एकाच वेळी आठ ठिकाणी / गोष्टींमध्ये लक्ष/ अवधान असणे.

वरील प्रतिसादांमध्ये प्रसंगावधान, वातावरणावधान इ. जी अवधाने दिली आहेत, ती अवधाने असणाऱ्याला "अष्टावधानी" म्हटले जाते असे कुठेही ऐकिवात नाही.

अष्टावधान प्रयोग : ह्यामध्ये एक संस्कृत पंडित एकाच वेळी आठ गोष्टींकडे अवधान देतो. हा प्रयोग मुख्यतः काव्यरचनेतील तत्परतेशी संबंधित आहे. त्यावेळी त्याच्यासमोर ८ प्राश्निक किंवा मराठीत 'जज्ज' बसलेले असतात.

१. त्यापैकी एक हा अपस्तुत प्राश्निक असतो. तो कोणत्याही वेळी, आणि कोणत्याही विषयावरील प्रश्न विचारू शकतो, ज्याचे उत्तर पंडितास ताबडतोब द्यावे लागते.

२. इतर ७ जणांपैकी १ जण त्याला हवे असलेले वर्णन आणि वृत्त सांगतो की ज्यानुसार पंडिताने श्लोक लिहावा.

३.तिसरा परीक्षक हा त्याला हवे असणारे शब्द सांगतो (संस्कृत धातूचे अमुक रूप वापरा, तमुक रूप वापरू नका इ.इ.)आणि त्यानुसार पंडित श्लोकरचना करतो.

४.चौथा परीक्षक पंडित महोदयांना पुराणवर्णन करायला सांगतो. अर्थात एखादा विषय देऊन त्याचे पुराण लावायला सांगतो.

५. पाचवा परीक्षक हा समस्यापूर्तीसाठी श्लोक देतो. म्हणजेच परीक्षकाने रचलेल्या किंवा त्याच्या मनात असलेल्या श्लोकाचा शेवटचा चरण सांगितला जातो, आणि पंडित महोदयांना पूर्ण श्लोक लिहायचा असतो. (परीक्षकाचा श्लोक आणि पंडिताचा श्लोक सारखेच असतील असे नाही)

६. सहावा परीक्षक हा दत्तपदीसाठी असतो. दत्तपदी म्हणजे, एका श्लोकाची काही पदे तुकड्या तुकड्यांनी पंडितापर्यंत पोहोचवली जातात. प्रयोगाच्या शेवटी त्या पदांपासून त्याने एक श्लोक तयार करावयाचा असतो.

७. सातवा परीक्षक हा निषिद्धाक्षरीसाठीचा असतो. निषिद्धाक्षरी म्हणजे, पंडिताला एखादे वर्णन किंवा विषय सांगितला जातो. आणि त्यावर एक श्लोक त्याने सांगायचा असतो. त्याने श्लोकातील एक अक्षर सांगितले की परीक्षक त्याच्या पुढील निषिद्ध अक्षर सांगतो. (उदा. सूर्य ह्या विषयी श्लोक लिहावयाचा आहे. जर पंडिताने पहिले अक्षर 'र' सांगितले तर परीक्षक 'व' हे अक्षर निषिद्ध आहे म्हणून सांगतो. अशा प्रकारे पूर्ण श्लोक तयार होईपर्यंत निषिद्ध अक्षरे सांगितली जातात. या श्लोकासाठीचे वृत्त 'अनुष्टुभ' असते.)

८. घंटाध्वनी- वरील सर्व गोष्टी चालू असतानाच एक परीक्षक मधून मधून घंटा वाजवीत असतो. पंडिताने प्रयोगाच्या शेवटी कितीवेळा घंटानाद झाला ती संख्या सांगायची असते.

वरील सर्व श्लोकांच्या बाबतीत पंडिताला लिखाणाची मुभा नसते. सर्व श्लोकरचना मनातच तयार करायच्या असतात.पंडित थोडा थोडा वेळ प्रत्येक श्लोकासाठी वापरत असला, तरीही अप्रस्तुत प्राश्निक हा त्याची एकाग्रता भंग करण्याचे काम करीत असतो, आणि घंटानाद हाही त्याचसाठी केला जातो. या दोनही गोष्टींकडे पंडिताला दुर्लक्ष करता येत नाही.

अशा प्रकारे ८ ठिकाणी एकाच वेळी अवधान असणाऱ्यास 'अष्टावधानी' म्हटले जाते.

(अशा प्रकारचा प्रयोग मी कोल्हापूर आणि पुणे येथे अनुभवला आहे.)

चैतन्य दीक्षित.