विरामचिह्नें
(शार्दूलविक्रीडित)
जेव्हां जीवनलेखनास जगतीं प्रारंभ मी मांडिला,
जो जो दृष्टिंत ये पदार्थ सहजीं वाटे हवासा मला!
बाल्याची पहिली अशी बदलली दृष्टी सदा बागडे,
तेव्हां 'स्वल्पविराम' मात्र दिसती स्वच्छंद चोहींकडे!
आहे काय जगांत? काय तिकडे? हें कोण? कोठें असे?
सांगा ईश्वर कोण? त्यापलिकडे तें काय? केव्हां? कसें?
जें तें पाहुनि यापरी भकतसे; दृक् संशयें टाकित,
सारा जीवन्लेख मी करितसें तैं 'प्रश्नचिह्नां'कित!
अर्धांगी पुढती करी वश मना, शृंगारदेवी नटे,
अर्धें जीवन सार्थ होइल इथें साक्षी मनाची पटे!
प्रेमानें मग एकजीव बनतां भूमीवरी स्वर्ग ये!
केला 'अर्धविराम' तेथ; गमलें येथून हालूं नये!
झाली व्यापक दृष्टि; चित्त फिरलें साश्चर्य विश्वांतरीं,
दिक्कालादि अनंतरूप बघतां मी होत वेड्यापरी!
सूक्ष्मस्थूलहि, सारखीं भ्रमवितीं; लागे मुळीं अंत न,
त्याकाळीं मग जाहलें सहजची 'उद्गार'वाची मन!
आशा, प्रेम, नवीन वैभव, तशी कीर्तिप्रभा, सद्यश,
हीं एकेक समर्थ आज नसतीं चित्ता कराया वश!
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथें असे जाहला,
देवा! 'पूर्णविराम' त्या तव पदीं दे शीघ्र आतां मला!