म. टा. मधील हा लेख बोलका आहे ... एक चांगला प्रतिसाद येथे देत आहे ...


वास्तवाचे अनेक पदर
इतकं वास्तव चित्रण कोणत्याही सिनेमात बघायला मिळालं नसेल. या वास्तव चित्रणाबद्दल दिग्दर्शकाचे कौतुक केलेच पाहिजे. परंतु झोपडपट्ट्यांत फक्त हेच वाईट प्रकार चालतात, असा चुकीचा संदेश या सिनेमातून जातो. अनेक चांगल्या गोष्टी, माणुसकीचे विविध पैलू या ठिकाणी अनुभवाला येतात. अत्यंत बिकट परिस्थितीत शिक्षण पूर्ण करणारी होतकरू मुलं-मुली तर येथे आहेतच; पण वेळप्रसंगी जातधर्म न बघता एकमेकांना मदत करणारी खरी माणसं या ठिकाणी आहेत. अत्यंत गरिबीत येथे सण तर साजरे करतातच; पण ६० वर्षांतील स्वातंत्र्याने ज्यांना काहीही दिलं नाही, तेच लोक त्या विषयी कोणतीही खंत न बाळगता मोठ्या उत्साहात १५ ऑगस्ट, २६ जानेवारी साजरे करतात याचं आश्चर्य वाटतं. 'असे'ही वास्तव या सिनेमात येणे आवश्यक होते. दुसरे असे की 'स्लमडॉग' हे शीर्षक झोपडपट्टीत गरिबीत स्वाभिमानाने जगणाऱ्या सर्वांचीच मने दुखवणारे आहे. तेव्हा हे शीर्षक बदलावे. जगातील श्रीमंतांच्या यादीत भारतातील
श्रीमंतांची नावे अनेक, जगातील बुद्धिजीवींमध्येही भारतातील नावं अनेक, हिंदी चित्रपटातील काल्पनिक श्रीमंती, वैभव अनेक सिनेमांत जगभर लोकप्रिय असताना स्लमडॉगने भारताची प्रतिमा कमी होत असेल तर गरिबांचा हक्क हिरावून घेणाऱ्यांनी त्याचा विचार आता तरी केला पाहिजे की याला जबाबदार कोण? आम्ही लोकप्रतिनिधी, भ्रष्ट प्रशासन आणि सदैव आपल्याच कोशात असणारा मध्यमवर्ग.
विद्या चव्हाण, नगरसेविका, मुंबई महापालिका