श्री. भूषण,
१. कवी स्वतः केलेली कविता जाहीर करतो याचे कारण हेच नाही काय की त्याला ती इतरांनी वाचावी व 'आवडली' म्हणावी?
मान्य! पण 'आवडली नाही' हे ऐकण्याचीही तयारी ठेवावी. तसेच काहीच प्रतिसाद न आल्यास वाचकांच्या बुद्धिमत्ता किंवा रसिकतेबद्दलच शंका काढू नये
२. प्रतिसादांसाठी कविता करू नये हे मत मला मान्य आहे, मान्य! पण प्रतिसाद महत्त्वाचे नसतील तर जाहीर कशाला करायची? आपली आपणही ठेवावी!
प्रतिसाद महत्त्वाचे आहेत. पण प्रतिसाद वाचक देत असतात. त्यावर कवीचे काय नियंत्रण असते? प्रतिसाद 'जो दे उसका भला, ना दे उसका भी भला' या वृत्तीने घ्यावेत.
३. माझ्या कवितांना जर इथे प्रतिसाद आले नाहीत किंवा खूप कमी आले, तर मी इथे कविता देणे बंद करीन. कारण उगाच आपला अन इतरांचा वेळ कशाला घालवायचा?
हे तुमचे मत वाचून अधिकच वाईट वाटले. कविता बरी किंवा चांगली असली तर मनोगत वर प्रतिसाद येतातच. कधी लवकर कधी उशीरा पण येतात नक्की! एक दोन कविता टाकल्या व जरा प्रतिसाद कमी (म्हणजे किती? ) आले की 'त्रागा' करून मुळात इथे अरसिक किंवा माझी खरी,दर्जेदार कविता न समजू शकणारे असंमजस असा समज करून इथे कविता देणे बंद करण्याची वृत्ती संतापजनक आहे.
मला सांगा, समजा तुमच्या पहिल्या कवितेला 'खूप' (तुम्हाला हवे तितके) प्रतिसाद आले व पुढच्या तीन कवितांना कमी वा शून्य प्रतिसाद आले तर इथला वाचकवर्ग रसिक की असंमजस? मग थांबणार की जाणार?
कविने प्रतिसाद मिळवावेत, डिंमांड करू नयेत!!
४. कविता स्वसमाधानासाठी करतात हे मला मान्य आहे व समजतेही. पण जाहीर केली गेलेली कविता तशी धरू नये.
मान्य! मग वाचकांनाही गृहित धरू नये!
५. कवितांचे पुस्तक काढल्यास ते विकत घेणाऱ्याला कसे वाटले हे समजणे जरा अवघड आहे. पण वेबसाईटवर कविता प्रसिद्ध झाली की ती आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध होते. त्यात आलेले प्रतिसाद सरळ सरळ दिसतात. अशा वेळी प्रतिसादांच्या संख्येवर एखाद्याचा 'कवी' म्हणून दर्जा ठरू शकतो. ( अर्थातच प्रतिसाद पॉझिटिव्ह असले तर अन वाचकाची कविता जोखण्याची क्षमता नसेल तर ). याच कारणासाठी मी याआधीसुद्धा तसेच याही स्थळावर प्रत्येक रचनेला निदान प्रतिसाद तरी दिलेलाच आहे. लोकांनी कवी म्हणून ठरवलेला 'दर्जा' आवश्यक नाही अशीही काही कवींची भूमिका असेल. पण मला तरी तो महत्त्वाचा आहे. याचे कारण मी ती कविता मुळात जाहीरच यासाठी करत असतो की ती इतरांनाही आवडावी व त्यांना बरे वाटावे व मला महत्त्व मिळावे. याला आपण स्वार्थी म्हणू शकता. ( बाय द वे - 'या' कवीच्या रचनेला प्रतिसाद दिलाच पाहिजे अशी उर्मी काही कवींना निर्माण होते त्याची कारणे वैयक्तिक असावीत. )
उदाहरण - 'चुकले असावे' या गझलेवर या स्थळावर आलेल्या प्रतिसादावरून जयंतासाहेबांचा कवी म्हणून दर्जा ठरावा की अन्यत्र हा प्रश्न आहे.
ही चर्चा तात्त्विक /साहित्यिक पातळीवर राहावी! 'अ' कविता वा 'ब' कवी या पातळीवर येऊ नये ही नम्र विनंती.'चुकले असावे'ला आलेले कमी-जास्त, बरे-वाईट प्रतिसाद शिरसावंद्य! एकही प्रतिसाद आला नसता तरी मी तितक्याच उत्साहाने पुढची कविता येथे दिली असती.
जयन्ता५२