...साधारणतः आयुष्यात एकदाच विवाह करत असाव्यात असे वाटते. क्वचित्प्रसंगी (पुनर्विवाहाच्या बाबतीत) दोनदा, फारतर तीनदा. अपवाद खूप नसावेत. (द्रौपदी आणि एलिझाबेथ टेलर एवढे दोनच चटकन आठवतात.)

बहुपतीकत्व (पॉलिअँड्री) ही पद्धत काही थोड्या समाजांत अस्तित्वात असली तरी कोणत्याही मराठीभाषक समाजात ती नसावी असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

सामान्यतः एका विवाहात कोणत्याही बाजूकडील उत्सवमूर्तीस (म्ह. वधूस किंवा वरास) एकच उखाणा घ्यावा लागतो असे वाटते.

थोडक्यात, कोणत्याही एका होऊ घातलेल्या मराठीभाषक वधूस इतक्या उखाण्यांची गरज उभ्या आयुष्यात सामान्यतः पडत नसावी असे प्राथमिक निरीक्षणावरून वाटते.

मात्र, हा उपक्रम पूर्णपणे निरुपयोगी नाही असे सुचवावेसे वाटते. हल्ली सामुदायिक विवाहसोहळ्यांविषयी ज्या बातम्या अधूनमधून ऐकू येतात, अशा प्रसंगी प्रस्तुत उपक्रम अत्यंत उपयोगी ठरेल असे वाटते. लग्नखर्च अनेक जोडप्यांत वाटणे आणि लग्नसोहळ्यांत पैशाचा अनावश्यक अपव्यय न करण्यास प्रोत्साहन देणे असे अनेकविध सामाजिक फायदे असलेल्या या येऊ घातलेल्या अत्यंत स्तुत्य प्रथेसही त्यायोगे हातभार लागेल, हे वेगळेच.