जीवनमान, वातावरण, अंतरे, मराठीपणा, बुद्धी, स्वच्छता, माणूसकी, साहित्यप्रेम, चोखंदळपणा, वेळेची उपलब्धता, बऱ्या वेळी घरी येऊ शकणे, वाहनांची संख्या, प्रदुषण, निवांतपणा, जवळ असलेली ऐतिहासिक / थंड हवेची ठिकाणे, सुरक्षितता या सर्व बाबींमध्ये 'पुणे' हे 'मुंबईपेक्षा' बरे आहे.
वरील मुद्द्यांची नैसर्गिक आणि मानवनिर्मित अश्या दोन वर्गात विभागणी केल्यास, नैसर्गिक/भौगोलिक बाबतित पुणे मुंबैपेक्षा नक्कीच सरस आहे. नैसर्गिक बंदर, आणि दमट हवा या मुंबईच्या विकासास सुरुवातीला हातभार लावणार्या देणग्यांखेरिज फारश्या देणग्या मुंबईला निसर्गाकडून मिळालेल्या नाहीत. म्हणूनच, वातवरण, अंतरे, मराठीपणा, वेळेची उपलब्धता, ऐतिहासिक/ थंडहवेची ठिकाणे या बाबतीत पुणे निश्चितच बरे नव्हे उत्तम आहे.
पण मानवनिर्मित गोष्टींचा विचार केल्यास मुंबई ही अनेक बाबतीत सरस ठरते.
परिवहन व्यवस्था: अंतरे पुण्याच्य कैक पटीने जास्ती असूनही कोठेही जाणे खुप सोपे आहे मुंबईत. प्रदुषण: बुरखा न वापरताही सहज वावरता येते
स्वच्छता: धारावी/दादर चौपाटी वगळता इतर अनेक भाग मुंबईत आहेत.
चोखंदळ पणाः म्हणजे नक्की काय हो? मुंबईत हव्या त्या दर्जाची वस्तू (भाजी फळापासून कोणतीही) मिळणे जास्त सोपे असते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
बुद्धी: आता ही कोण आणि कशी मोजणार? इतरांनाही असते थोडीफार हे पुणेकरांनी मान्य केले तरी मिळवली.
सुरक्षितता: मुंबईत रात्रीअपरात्री फिरणे फार धोक्याचे नाही. मुंबईवर बाहेरून होणारे अतिरेकी हल्ले मुंबई असुरक्षित करू पाहत आहेत, पण मुळात मुंबईएवढे सुरक्षित एवढे मोठे शहर सापडणार नाही.
माणुसकी: एकमेकांना समजून घेणे या बाबतीत पुणेकर मुंबईकरांच्या बरेच मागे आहेत. पुण्यात कुणास माणुसकीचे उदत्त दर्शन घडल्यास येथे लिहावे. अतिरेकी हल्ले, नैसर्गिक आपत्ती अश्या अनेक घटनांमध्ये मुंबईकरांनी माणुसकीचे दर्शन जगाला घडवले आहे. (दुसर्या दिवशी कामावर जाणे ही कदाचित अगतिकता असेल, पण आल्या प्रसंगाला स्वत: तोंड देत इतरांना मदत करणे ही माणुसकी आहेच).
साहित्यप्रेमः बुद्धी प्रमाणेच No comments.
आणखी काही गोष्टी ज्या मुंबईत सरस आढळल्याः
कामातील व्यवसायिकता आणि सचोटी (किंवा आपल्या कामाविषयी निष्ठा).
रेल्वे स्टेशनः मुंबईच्या संस्क्ऱीतीचा अविभाज्य भाग. स्टेशन परिसरात जिवनवश्यक ते सर्व असते. भाजीपाल्या पासून शाळाकालेजा पर्यंत. प्लंबर पासून बूटपलिशवाल्यापर्यंत. दादर/भुलेश्वर/ग्रांट रोड ला न जाताही दर्जेदार वस्तू मिळू शकतात.
मुंबई झोपत नाहीः पुणेकर याला अगतिकता म्हणोत. पण अपरात्री कुठे जायचे असेल, आणि स्वतःचे वाहन नसेल, तर पुण्यात काय करतात? मुंबईत टाक्सी रिक्शा अगदी कोणत्याही कोपर्यात मिळते. ३-४ किमी परीसरात केव्हाही चहा/खाणेपिणे मिळू शकते.. सुरक्षित पणे.
मुंबईला मी पुण्यापेक्षा बरेच जास्त पावसाळे काढलेले आहेत. अजून पुण्याचे पूर्ण दर्शन व्हायचे आहे. आणि सध्या तरी मुंबई हे माझे मूळ गाव असल्यामुळे जरा जास्त जिव्हाळा आहे.. हे मी मान्य करतो. भविष्यात पुण्यातल्या अधिकाधिक 'बर्या' गोष्टी नजरेस येऊन मत सुधारण्याचीही आशा करतो.
पण एक मत बदलणार नाही- पुण्यात अनेक गोष्टी छान आहेत, पण 'काय उणे?' हा प्रश्न आढ्यतेखोर आहे.