प्रश्न १) मराठी माणसाने उद्योजक होण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहे?

उत्तर) मराठी माणसाने आपले मराठीपण वा 'पणा' सोडून द्यायला हवा. 'मराठीपणा' सोडून कसा द्यायचा? असा प्रश्न आल्यावर माझं म्हणण आहे की त्याने गुजराती वा इतर उद्योजक वृत्ती असलेल्या भाषक समाजातील मुलीशी लग्न करावे. माझा सख्खा मावस भाऊ हा हिऱ्यांच्या फॅक्टरीत कामाला होता. त्याच काळात त्याचं त्याच्या घराजवळच रहाणाऱ्या एका गुजराती मुलीवर प्रेम बसले, लग्न ही झाले. मुलीच्या वडीलांचा धातूच्या खिडक्यां, दरवाजांचे वेल्डींग करण्याचा व्यवसाय होता. मुलगी एकुलती एक असल्यामुळे माझा मावसभाऊ (स्वभावाने मराठी, मानी) अनेकदा विनंती करून ही तो त्या व्यवसायाकडे लक्ष घालत नव्हता. एकदा अचानकपणे काही कारणास्तव त्याची नोकरी त्याला गमवावी लागली. नोकरी वरून काढण्यापूर्वी त्याच्या मालकाने त्याला घरी जेवायला बोलावले. त्या दिवसानंतर तो सासऱ्याच्या व्यवसाया सारखाच आपले दुकान विकत घेवून स्वतःचा वेल्डिंगचा व्यवसाय सुरू केला. त्याच्या सासऱ्याने त्याला अनेक बाबतीत मार्गदर्शन ही केले. आज माझा भाऊ छोटा का होईना एक व्यवसायिक आहे. घरात तो त्याच्या बायकोशी हिंदीतूनच बोलतो.

तात्पर्यः स्वतःमध्ये जर उद्योजकतेचे गुण नसले तर तसा जोडीदार शोधायला हवा मग भले तो मराठी नसला तरी चालेल. जोडीदाराचे अर्धे गुण व अर्ध नशीब आपल्याला मिळतंच. यश हवं असेल तर 'मराठीपण' सोडायची तयारीही हवीच. हाच निर्सगाचा नियम असावा.

प्रश्न २ ) आपल्या न्युनगंडावर कशी मात करावी?

न्यूनगंड हा स्वतःबद्दलची मते ही दुसऱ्या व्यक्तींच्या मतावर जेंव्हा बेतली जातात, तेव्हा तयार होतो. स्वतःबद्दलची मते स्वतःच ठरवायची व ती जोपासायची असतात. दुसऱ्यांची आपल्याबद्दलची मते ऐकून न ऐकल्यासारखे करायचे असते, भासवायचे असते. करायचे तेच जे आपल्याला योग्य वाटते.

यशाचा मार्ग 'प्रेम' व 'प्रणय' यातूनच जातो असा माझा (अजूनतरी) 'समज' आहे.

यशाच्याच शोधात असलेला.....

सतीश रावले