खूप चांगला प्रस्ताव आणलास चर्चेला!
मला तुझा अभिमान वाटतो. तू एक सार्थ आत्मविश्वास असलेली मुलगी आहेस.
मराठी माणसांमध्ये उद्योजक नाहीत असे नाही. किर्लोस्कर वगैरे लोक आहेतच. पण तू म्हणतेस तेही खरे आहे, खूप मराठी लोक उद्योजक नाहीत.
राहणीमानाच्या संदर्भात असलेली तौलनिक अल्पसंतुष्टी, गोड बोलण्याशी / व्यवसायासाठी कमीपणा घेण्याशी असलेले थोडे वावडे, आपण गिऱ्हाईकापेक्षा महत्त्वाचे आहोत अशी थोडीशी भावना व नोकरीमध्ये असलेली 'कमी जबाबदारी' न सोडावीशी वाटणे ही माझ्यामते 'मराठी माणूस प्रामुख्याने उद्योजक नसण्याची' महत्त्वाची कारणे आहेत. यातील कुठलेही एक, दोन, तीन किंवा सर्व कारणे एका वेळी लागू होत असावीत.
तरीही, सुदैवाने, आता खूप मराठी माणसे काही ना काही स्वरुपाचे व्यवसाय करत आहेत. त्यालाही, एकंदर स्पर्धा व नोकऱ्यांची कमी उपलब्धता ही कारणे असू शकतील. पण कसे का होईना, ते होत आहे.
आता गिऱ्हाईकाच्या दृष्टीकोनातून पाहताना आपण जास्तीतजास्त माल मराठी माणसांकडून घ्यावा असे ठरवता येईल.
मात्र : माझे या बाबतीत सर्वात महत्त्वाचे मत असे आहेः
मराठी वगैरे काहीही नसते. जो तो आपल्याला जमेल तसे व जगता येईल तसे जगत असतो. मराठी, गुजराती, कानडी याला काहीही अर्थ नाही. गुजरात्यांनी कष्ट केले असतील तर त्यांनी का बरे मोठे होऊ नये? मराठी माणसांनी उद्योजक व्हायलाच पाहिजे असे का बरे? करुदेत की नोकऱ्या? मराठी माणसांना उद्योजक नसल्यामुळे कसले प्रॉब्लेम्स येत आहेत? तू स्वतः मुंबईत आहेस व मराठी आहेस ( ही माझी गृहीते आहेत, जे मला वाटले त्यावरून ) म्हणून तू मराठी माणसांच्या बाजूने बोलत आहेस. तुझा जन्म जर अहमदाबादला झाला असता तर तू मुंबईत येऊन व्यवसाय थाटण्याची इच्छा व्यक्त केली असतीस. ( हे मी वैयक्तिक लिहीत नाही हे तुलाही मान्य होईलच. )
जन्मभूमीचे नैसर्गीक गुण, व्यक्तीगत स्वभाव, संस्कार, भोवतालची परिस्थिती, आलेले अनुभव, बुद्धिमत्ता, संभाषण कौशल्य, संधीची उपलब्धता, महत्त्वाकांक्षेचा प्रकार व तीव्रता, भावनिकता, मानसिकता यावर माणूस कोण होणार हे ठरते. ते ठरवून करण्याचे प्रकरण आहे असे मला वाटत नाही.
तुझ्या या चर्चाप्रस्तावातून तुला जे हवे आहे ते लाभो अशी प्रार्थना व तुला शुभेच्छा!