चांदणी, चर्चेसाठी हा चांगला विषय आहे. पण चर्चेचं जे शीर्षक आहे ते "मराठी माणसाने उद्योजक होण्यासाठी कोणती पाऊले टाकावीत" यापेक्षा "उद्योजक होण्यासाठी कोणती पाऊले टाकावीत" हे जास्त योग्य ठरलं नसतं का? खरंतर मराठी काय किंवा अमराठी काय कुणासाठीही अमुक असे कुठचेही ठोस उपाय सांगताच येणार नाहीत की जे केले असता नक्की यशस्वी उद्योजक होता येतं. वरच्या प्रतिसादांमधले उद्योजक होण्याचे सगळेच उपाय हेही माझ्या मते फारच ढोबळ आणि ऍबस्ट्रॅक्ट आहेत. आणि परत तेही मराठी, अमराठी सगळ्यांनाच लागू पडतात. आणि हे सारे उपाय उपयोगात आणूनही धंद्यातल्या यशस्वितेची खात्री देता येतच नाही. म्हणजे उदाहरणार्थ नोकरी करणाऱ्या एखाद्या गुजराथी माणसाला धंद्यात पडण्यासाठी तेवढंच साहस (संजयच्या प्रतिसादातलं) लागेल जेवढं मराठी माणसाला लागेल. मला नाही वाटत मराठी असण्यामुळे काही जास्त साहसाची गरज पडते. पण त्याच बरोबर प्रत्येक साहसी मनुष्य धंद्यात यशस्वी होईलच असं काही नाही.
ज्यांच्या घरात वडिलोपार्जित धंदा असतो त्यांच्या घरात मुलांना धंद्याचं बाळकडू घरातच मिळतं. त्यामुळे कुठल्या परिस्थितीत काय निर्णय घ्यायचे, भांडवल कसं उभं करायचं, धंद्यासाठी आवश्यक असणारं 'साहस' कसं अंगी बाणवायचं, हाताखालच्या लोकांना कसं वागवायचं वगैरे वगैरे गोष्टींचं ज्ञान अशा लोकांच्या अंगी मुरलेलं असतं. त्यामुळे असे लोक धंद्यात यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. ज्या लोकांच्या घरात असं वातावरण नसतं त्यांना मोठी किंमत देऊन हे सारं आत्मसात करावं लागतं. हा थोडासा आधी कोंबडी की आधी अंडं अशा स्वरुपाचा प्रश्न आहे. मराठी घरांमध्ये (सर्वसाधारणपणे) धंद्याचं वातावरण नसतं म्हणून उद्योजक कमी असतात आणि उद्योजक कमी असतात म्हणून धंद्याचं वातावरण नसतं. ही परिस्थिती बदलतीये, पण अतिशय हळू हळू आणि त्याला काही इलाज आहे असं मला तरी वाटत नाही.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठी माणसाची दूरदृष्टी (vision) विशेषतः आर्थिक व्यवस्थापनाची खूपच कमी पडते, असं मला वाटतं. (वरच्या एकाही प्रतिसादात याचा उल्लेखही नाही हे याचं द्योतक म्हणता येईल का? ) म्हणजे आपल्याला नक्की काय करायचंय, किती वर्षात आपण कुठे पोहोचू, त्याठिकाणी पोहोचण्यासाठी किती भांडवल लागेल आणि आपण ते कुठून उभं करणार, भांडवलाचा वापर कसा करणार, भांडवल कमी पडलं तर काय उपाय योजना करणार, आपल्या धंद्याचं पतधोरण आपण काय ठेवणार, आपल्या धंद्याला असणारे बाह्य धोके काय , त्यांना तोंड कसं द्यायचं या आणि अशा गोष्टींचा आपण कधीही विचारही करत नाही किंवा तशा प्रकारचं शिक्षणही आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आपल्या लोकांचं (धांदिक समाजांपेक्षा) धंद्यात आपटी खाण्याचं प्रमाण खूपच जास्ती असतं. त्यातून आपण एक असं ठरवून टाकतो की मराठी असल्यामुळेच आपण धंद्यात आपटतो.
माझ्या तरी मते अशी धंद्यातल्या यशस्वितेची (मराठी किंवा अमराठी माणसांसाठी) अमुक अशी कुठचीच गुरुकिल्ली नाही.