संजय, तुमची आधीच माफी मागून आणि तुम्ही वैयक्तीकरित्या घेणार नाही अशी अपेक्षा करून, माझी मतं स्पष्टपणे लिहिते. चू. भू. दे. घे.
असे जगायचे असेल तर नोकरी करता येणार नाही, स्वतःचा व्यवसायच हवा.
असं कसं म्हणता येईल. उलट नोकरीत ठरावीक वेळेतलंच काम असतं. रात्री दहा वाजता एखाद्या गिऱ्हाईकाचा फोन आला तर सांगता येतं की मी आत्ता जरा बाहेर आहे, उद्या सकाळी बघतो. पण स्वतःच्या व्यवसायात निदान उमेदीच्या काळात तरी नक्कीच असं स्वातंत्र्य उपभोगता येत नाही. कारण संपूर्ण जबाबदारी तुमच्यावरच असते. लाखो रुपयांचं कर्ज डोक्यावर असतं. लोकांची देणी असतात. त्याचा रात्रंदिवस प्रचंड मानसिक दबाव असतो. शारीरिक दृष्ट्या जरी तुम्ही मोकळा वेळ काढू शकलात तरीही मानसिकदृष्ट्या मात्र फुरसत मिळणं अशक्यच असतं. जो व्यावसायिक असं म्हणू शकतो की मी मनानंही धंद्यापासून काही काळ सुटी घेऊ शकतो, तो एक तर खोटं तरी बोलतो किंवा त्याचा धंदा अगदीच किरकोळ स्वरुपाचा असतो, असं मला वाटतं.
या सगळ्या प्रोसेस मधून मी गेलेलो आहे. त्यामुळे दिवसाचे काँपोझीशन तर बदलायचे (धंदा किंवा व्यवसाय करून) आणि मिळालेल्या फुर्सतीचा आयुष्य फुलवायला उपयोग करायचा असा अप्रोच हवा.
असं तुमचं मत आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? तसं असेल तर ठीक आहे. पण जनरलाईज करून कसं चालेल? मला कित्येक उद्योजक असे माहिती आहेत ज्याना आयुष्य फुलवणं सोडा स्वतःच्या बायका मुलांकडे बघायलाही वेळ नसतो आणि तरीही ते आणि त्यांची बायकामुलंही आनंदी असतात. 'आयुष्य फुलवणं' वगैरे असं काही त्यांच्या गावीही नसतं. त्यामुळे असं जनरलाईज नाही करता येणार.
माणसाचे मन चार वर्णात विभागलेले आहे (ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र). मनाचा ब्राम्हण भाग विचार करतो, वैश्य आर्थिक मोजमाप दाखवतो, शूद्र धोके दाखवतो आणि क्षत्रिय सहस करतो. हे सगळे मनाचे उपयोगी भाग समजा, सगळ्या मनाचा एकसंध उपयोग करा. स्वतःला मनाच्या एका विभागात बसवणे म्हणजे बंधन यातून न्यूनगंड निर्माण होतो. नुस्ता वैश्य केवळ पैश्याच्या मागे लागतो, क्षत्रिय कलहाची संधी शोधतो, ब्राह्मण चर्चा करत रहतो आणि वैश्य भित्रा माणूस होतो. स्त्री असाल की पुरूष, संपूर्ण व्यक्ती व्हा, आयुष्य हा उत्सव आहे, आणि मी तुमचाशी शेअर करतो आहे, मी सगळ्या धोक्यातून आणि शक्यतातून जगलो आहे, आयुष्य महत्त्वाचे आहे, पैसा किती आहे या पेक्षा तो वापरता कसा यात तुमचे कौशल्य आहे. साहस करा आणि मजेत जगा.
वरती मिलिंद जोशींच्या प्रतिसादात त्यांनी म्हटलंय की हे प्रतिसाद फार ढोबळ आणि ऍबस्ट्रॅक्ट आहेत. मला हे पटलं. तुमचा वरचा उतारा, माझ्या मते, ढोबळ आणि ऍबस्ट्रॅक्टपणाचं उत्तम उदाहरण आहे. (माफ करा मी अगदी स्पष्टपणे लिहितीये, फक्त जे मनापासून वाटतंय ते लिहितीये. ) "सगळ्या मनाचा एकसंध उपयोग करा" - म्हणजे नक्की काय करा? असं सांगितल्यामुळे कुणी ठरवून, तुम्ही सांगितलेल्या मनाच्या चारही आस्थापनांचा एकसंध उपयोग करू शकेल का? "आयुष्य हा उत्सव आहे आणि मी तुमचाशी शेअर करतो आहे... " या म्हणण्याला स्पेसिफिक असा काही अर्थ आहे का?
तुमच्या प्रतिसादावर एवढ्या परखडपणे लिहिण्यामागचा हेतू एकच आहे की, धंदा कसा करावा या बाबतीत लोकांना शिकवणारी बरीचशी पुस्तकं, बरीचशी व्याख्यानं आणि बरेचसे लोक असेच फक्त ढोबळ सल्ले देतात. यानं भारावून जाऊन आणि हे सल्ले ढोबळ आहेत लक्षात न घेता मुलं तरुण धंद्यात पडतात आणि वास्तवाचं दर्शन झाल्यावर त्यांचे डोळे पांढरे व्हायची पाळी येते. त्यामुळे असे वरवरचे सल्ले देऊ नयेत असं माझं स्पष्ट मत आहे.
मागे काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र बँकेतर्फे एका व्यावसायिकता शिबिरात अशीच बरीच भाषणबाजी झाल्यावर मी सांगितलं होतं की अमुक अमुक अमुक एवढ्या कागदपत्रांची पूर्तता असेल तर आम्ही लगेच कर्ज देऊ असं तुम्ही का सांगत नाही? यावर बँकेचे तिथे आलेले अधिकारी मूग गिळून गप्पच बसले.
भाषणबाजी करणं आणि सल्ले देणं सर्वात सोपं काम असतं. स्पेसिफिक्समध्ये जाणं अवघड. म्हणूनच ते फारसं कुणी करत नाही.