तुरिय,
तुमची कविता वाचली, त्यातील भावना व आशय पोहोचला. मात्र त्यात अनवधानाने राहून गेलेल्या काही किरकोळ चुकांमुळे रसास्वादास बाधा येत आहे.
आनंदाचे ते क्षण हरवू नयेत म्हणून
काळजाच्या तिजोरीत लपून ठेवतो
-एखादी गोष्ट लपून राहाते पण लपवून ठेवली जाते. लपणे व लपविणे ह्यात फरक आहे. तेव्हा दुसरी ओळ 'काळजाच्या तिजोरीत लपवून ठेवतो' अशी हवी.
मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असच राहील
- इथे मैत्रीचं पर्सॉनिफिकेशन ( ह्याला मानवीकरण असा मराठी प्रतिशब्द आहे का? ) केले आहे का? तुझ्याशी आणि माझ्याशी त्या मैत्रीचं नातं आजन्म असच राहील असं म्हणायचं आहे का? की तुझ्या-माझ्यातील मैत्रीचं नातं असं म्हणायचं आहे? तसं असेल तर
मैत्रीचं नातं तुझं
माझ्याशी आजन्म असच राहील
असं हवं, किंवा
मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्यात आजन्म असच राहील
असं तरी हवं.
मन माझे वेडे
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
- 'मन' हा शब्द एकवचनी वापरल्यावर 'घेतात' कसे चालेल? 'घेते' हवे. "... मैत्रीचा वेध घेतात"शी यमक जुळावे म्हणून "... क्षणांचा शोध घेतात" म्हणायचे असेल तर 'मन' ऐवजी 'मनं माझी वेडी' करा. अर्थात 'मनं' हे बहुवचन वापरल्यास त्या प्रेमिकास स्किझोफ्रेनिया झाला आहे कि काय ही शंका वाचकास येऊ शकण्याचा धोका पत्करावा लागेल.
तिसऱ्या व पाचव्या कडव्यातही यमक जुळवण्यासठी जरा वेगळ्या प्रतिमा वापराव्या लागल्याचं जाणवतं.
तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती
- "दाटली"मुळे पुढच्या ओळीत उन्हं अपरिहार्यपणे "आटली" असल्यासारखं वाटतं आहे.
मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असच राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील
- "राहील"मुळे डोळ्यांऐवजी पापणीस वाहावे लागत आहे. हे शेवटचे दोन दाखले जरी काव्यात्म मोकळीक (पोएटिक लिबर्टी) म्हणून स्वीकारार्ह असले तरी त्याआधी उल्लेख केलेल 'लपून', 'तुझ्या माझ्याशी', 'मन.. शोध घेतात' हे मान्य करणे जड जात आहे. त्यांच्यामुळे तुमच्या कवितेच्या सौंदर्यास उगाच गालबोट लागत आहे हे माझे प्रामाणिक मत आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.