यासंबंधी मला असलेली माहिती आपल्या प्रश्नांच्या अनुषंगाने देण्याचा प्रयत्न करत आहे. ही माहिती पुण्याच्या व्यवस्थेबद्दल आहे. इतर ठिकाणची मला माहिती नाही. (आपल्या प्रश्नांचे क्रमांक व माझ्या उत्तरांचे क्रमांक यांचा काहीही संबंध नाही. )
१) दहावीच्या निकालाच्या दिवशी निकालाबरोबरच आपल्याला हव्या त्या शाखेचे अर्ज दिले जातात किंवा सेंट्रलाईझ्ड (मराठी शब्द? ) पद्धतीमुळे कोणत्याही महाविद्यालयातून (संबंधित विद्यापीठ किंवा महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत महाविद्यालये) घेऊन कोणत्याही महाविद्यालयात भरले तरी चालतात. साधारणपणे अर्ज घेण्यासाठी ७ ते १० दिवस मुदत असून नंतर भरण्यासाठी ५ ते ६ दिवस मुदत देण्यात येते. (अर्ज घेण्यासाठी अर्धा तास व नंतर भरण्यासाठी १ ते ३ तास एवढा वेळ लागू शकतो. )
२) प्रवेश अर्जावर आपण प्रवेश घेऊ इच्छीत असणाऱ्या महाविद्यालयांची उतरत्या क्रमाने यादी द्यायची असते. ज्यामुळे आपल्या मार्कांनुसार आणि प्राधान्यक्रमानुसार योग्य त्या महाविद्यालयांत आपले नांव लागते.
३) अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपासून साधारण १५ दिवसांनी पहिली यादी वर्तमानपत्रात आणि सर्व महाविद्यालयात जाहीर केली जाते. त्यानंतर ३ दिवसांनी दुसरी यादी जाहीर होते. ही यादी सर्व महाविद्यालयांत आणि वर्तमानपत्रातही येत असल्याने आपल्या सोयीच्या कोणत्याही महाविद्यालयांत जाऊन खात्री करून घेऊन नंतर योग्य त्या महाविद्यालयांत प्रवेश घेता येतो. सर्व महाविद्यालयांची प्रवेश अर्ज देण्याची, घेण्याची तसेच प्रवेश देण्याची, रद्द करण्याची अंतिम तारीख सारखीच असते. मात्र अर्ज घेतल्यानंतर किती किती दिवसानी? याबाबत माहिती करून घ्यावी लागेल.
४) प्रवेश घेण्यासाठी २ तासापासून ते ४-५ तासांपर्यंत कितीही वेळ लागू शकतो. शक्यतो प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या वेळेअगोदर तासभर पोचावे. बऱ्याच महाविद्यालयांत (पुण्यात तरी बहुधा सर्वच) प्रवेश अर्ज स्वीकारल्यानंतर प्रवेश शुल्क भरण्यासाठी चलन देऊन बँकेत पाठवले जाते. शहराबाहेरचे असाल तर बँक शोधणे ते रांगेत उभे राहून पैसे भरणे यात अतोनात वेळ जातो. (बहुतेक वेळा बँक चालण्याच्या अंतरावरच असते हे नक्की. )
५) संबंधित महाविद्यालयातून प्रवेश रद्द करण्यासाठी जितके लवकर जाल तितके रद्दीकरण शुल्क कमी कापले जाते. साधारणपणे ते १०% असते. त्यासाठी अर्थातच रद्दीकरणाचा विशिष्ट अर्ज भरून द्यावा लागतो तो त्या त्या महाविद्यालयांत उपलब्ध असतो. यासाठी चकरा माराव्या लागत नाहीत. एका फेरीत हे काम होते. सर्वजण ह्या कामी जुंपलेले असल्यामुळे फार अळंटळं करू शकत नाहीत.
६) पुण्यात तरी जवळजवळ सर्व महाविद्यालयांत चारचाकी वाहनतळ उपलब्ध आहेत.
प्रत्येक महाविद्यालयात मागील वर्षी कोणत्या शाखेत किती टक्क्यांना प्रवेश दिला गेला हे कुठे कळते? प्रत्येक महाविद्यालयाची प्रवेश क्षमता किती आहे हे कुठे कळते?
ह्या प्रश्नांची उत्तरे संबंधित महाविद्यालये किंवा मागील वर्षीची वर्तमानपत्रेच देऊ शकतील.
अ) आपण केलेल्या सूचना योग्य आहेत आणि महाराष्ट्र बोर्डाने निदान पुण्यात तरी त्या आधीच अमलात आणल्या आहेत त्यामुळे त्याबद्दल काही लिहित नाही.
ब) प्रवेशप्रक्रियेसंबंधीची सर्व कामे 'एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ' ह्या चालीवर करावीत.
ही कामे शक्यतो मुलांनाच करू द्यावीत ह्या मुद्द्याच्या बाबतीत मृदुला यांच्याशी सहमत. माझी अकरावीची आणि पुढच्या सर्व प्रवेशप्रक्रियांचे दिव्य मी स्वतः पार पाडल्याने यात पारंगत झालो आहे.
धन्यवाद!!!