प्रतिभेच्या भरात शक्यतो एका सपाट्यात लिहून होते ती कविता. ती विचारपूर्वक जुळवून जुळवून करता येत नाही. दुसरा महत्त्वाचा प्रतिभा प्रकार म्हणजे कथा किंवा कादंबरी, यात 'प्लॉट' (मराठीत यास 'ढाचा' शब्द योग्य आहे काय?) ठरवताना अनेक बाजूंनी विचार करावा लागतो. याउलट कविता विषय ठरवून करता येत नाही. किंबहुना माझ्या मते कवी कविता करतच नाही. ती वातावरणात निर्माण होते आणि योग्य काळ येताच कवीवाटे शब्दरूप पावते.
जरी नादमयता, यमक असे गुण कवितेस वापरता येतील, तरी ही कवितेची लक्षणे आहेत, व्याख्या नव्हे. आणि एखादे लक्षण न आढळल्यास संपूर्ण अस्तित्व नाकारणे मला योग्य वाटत नाही.