विडंबन (पॅरोडी) म्हणजे काय ह्याच्या व्याख्या व सविस्तर माहिती इथे पाहा. विकिपीडियातील व्याखेचे भाषांतर असे काहीसे होऊ शकेल :

'एखाद्या मूळ रचनेची, वा तिच्या विषयाची, वा रचनाकाराची, वा अन्य कुठल्या तरी लक्ष्याची विनोदाने, उपहासाने किंवा उपरोधाने केलेली थट्टा-मस्करी किंवा टवाळी, किंवा त्यावर केलेली टिप्पणी वा भाष्य.'

या व्याख्येतील "... वा अन्य कुठल्या तरी लक्ष्याची... " हा वाक्यांश नजरेआड करून चालणार नाही.

"रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका" या त्यांच्या लेखसंग्रहातील 'झेंडूची फुले' या प्रकरणात पु. ल. देशपांडे लिहितात,

"मुळातली एखादी चांगली कविता विनोदासाठी विकृत करणं म्हणजे विडंबन नव्हे. एक तर कुठलीही कलाकृती ही नुसतीच विकृती असून चालत नाही. तिच्यात कलागुण असावाच लागतो. चांगली विनोदनिर्मिती ही त्यामुळंच केवळ विकृती राहात नाही. विसंगतीचं दर्शन आणि विकृती ह्यांच्यातला फरक ध्यानात घ्यायला हवा. त्यामुळं विडंबनकविता म्हणजे दुसऱ्या एखाद्या कवितेच्या टवाळीवर चालवलेला बिनभांडवली धंदा नव्हे. कवितेची विडंबनं करायला चांगल्या विनोदबुद्धीच्या जोडीला चांगली कवित्वशक्ती असावी लागते. "

पुढे पु. ल. असेही म्हणतात,
" विडंबन ही मूळ कवितेची किंवा कवीची टिंगलटवाळी आहे, असंही पुष्कळांना वाटतं. विडंबनाचा रोख कशावर आहे हे लक्षात आलं नाही, की हे असं होतं. 'झेंडूच्या फुलां'त अत्र्यांनी 'मनाचे श्लोक' लिहिले आहेत ती काही समर्थ रामदासांची चेष्टा नव्हे. आधुनिक जगात कसं जगावं याचा मोठा साळसूदपणाचा आव आणून उपदेश करताना अत्र्यांनी प्रत्येक श्लोकात सामाजिक दंभ आणि इतर अपप्रवृत्तींकडे गमतीनं लक्ष वेधलं आहे :
मना सज्जना, चार आण्यात फक्त
तुला व्हावयाचे असे देशभक्त
तरी सांगतो शेवटीं युक्ति सोपी,
खिशामाजिं ठेवीं सदा गांधिटोपी!
पन्नास वर्षांपूर्वी सोयीस्कर रीतीनं गांधीटोपी चढवणाऱ्या आणि खिशात दडवणाऱ्या देशभक्तांची ती टोपी अत्र्यांनी बरोबर उडवली आहे. "

   मी हे सर्व उद्धृत केले असले तरी माझे आजवरचे या क्षेत्रातील प्रयत्न या व्याख्यांचे निकष पूर्णपणे पाळतात किंवा अत्र्यांच्या वा गोळेकाकांनी लेखमालेत नावाजलेल्या इतर दिग्गजांच्या आसपासही पोहोचतात असे माझे मुळीच म्हणणे नाही. केवळ त्यांच्या पहिल्या प्रश्नाचे बहुतेकांना अभिप्रेत असलेले उत्तर काय आहे ते येथे दिले आहे.