आप
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. 'उल्का किती' विषयी सांगायचे तर मी एकदा आकाशातून उल्का पडताना पाहिली. त्यावेळी आलेले विचार मनात घोळत होते. त्यावेळी माझी मुलगी-वय नऊ वर्षे-त्यावेळी बरोबर होती. तिला मला माहित असलेली माहिती सांगितली. त्या दृष्याने मनात घर केले होते. १९८६ सालची ही घटना. त्यावेळी हिंदीत कांही ओळी लिहून ठेवल्या होत्या. त्या आधारेच ही कविता रचली आहे.
एखादी अवकाशीय वस्तू आपली कक्षा जेव्हा सोडते आणि पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करते त्या घटनेला आपण उल्कापात म्हणतो. सूर्य हा प्रखर तेजाने पूर्ण आकाश झाकतो, त्यामुळे तारकांचे दर्शन होत नाही. त्याच्यासमोर तारका मनमोकळं राहू शकत नाहीत, त्यांना अंगदर्शन करता येत नाही, ही एक कल्पना. तो मावळला की या तारका सुटकेचा निश्वास टाकतात. तोच सायंकाळी सुटणारा मंद वारा. त्यानंतर निळ्या आकाशात चंद्र अवतरतो. मग या चांदण्या आपल्या मुखावरचे पटल दूर करतात.
त्यांचा आपुलकीनं त्याच्याशी सुखसंवाद सुरू होतो. तरीही या तारका स्वतःच्या मर्यादेत असतात. आपल्या कक्षा सोडत नाहीत.
एखादी कुलीन स्त्री ज्याप्रमाणे उंबऱ्याच्या आंत उभी राहून पाहुण्याशी बोलते, तसे हे वाटते. ती तारका आपल्याशी संवाद करताना मनुष्यलोकी मात्र त्यांना वेगळं पाहायला मिळतं असं सांगते. ती असं सांगते की आमच्यातील कुणी कक्षा सोडली तर एकच शिक्षा असते, ती म्हणजे तिला आकाशातून ढकलून दिलं जातं. (गंगा नदीनं मनुष्यलोकी येऊन मानवी योनी भोगली, अशी एक पुराणकथा आहे. ) अशा अमर्याद वागण्यानं स्त्रीला जे हाल भोगावे लागतात, त्याचे सुरेख वर्णन आपण केलेले आहेच.