ऐतिहासिक आणि पौराणिक व्यक्तींचा उल्लेख एकवचनी करायचा असा संकेत आहे.
असा सरसकट संकेत असण्याबाबत साशंक आहे, परंतु अनेक ऐतिहासिक व्यक्तींच्या बाबतीत एकवचनी उल्लेखाचा प्रघात आहे आणि त्या प्रघातात अनादराचा लवलेशही नाही, आणि अशा ऐतिहासिक व्यक्तींच्या बाबतीत तथाकथित आदरपूर्ण उल्लेख हा फार तर एक उपलब्ध विकल्प आहे, एवढे मात्र निश्चित. आणि अशा एकवचनी उल्लेखांत काहीही गैर नाही, याबाबत सहमत.
सरसकट संकेताबद्दल शंका एवढ्याचसाठी, की चंद्रगुप्त मौर्य, चाणक्य, हर्षवर्धन, गौतम बुद्ध, शिवाजी, संभाजी, औरंगजेब, पहिला बाजीराव, झाशीची राणी लक्ष्मीबाई, थोरले माधवराव पेशवे, राघोबादादा, नारायणराव पेशवा, रामशास्त्री प्रभुणे, लॉर्ड बेंटिंक, लॉर्ड माउंटबॅटन, लोकमान्य टिळक, आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, मोहंमद अली जीना या सर्व ऐतिहासिक व्यक्ती आहेत. मात्र चंद्रगुप्त मौर्य म्हणाला, चाणक्य म्हणालाच, हर्षवर्धनही म्हणाला, गौतम बुद्ध म्हणाला किंवा क्वचित म्हणाले, बोलूनचालून शिवाजी पडला शूर किंवा विकल्पाने शिवाजीमहाराज शूर होते, संभाजीही शूरच होता किंवा संभाजीमहाराजही काही कमी शूर नव्हते, मराठी माणसाकरिता औरंगजेबाला शूर म्हणणे हे त्याला 'जहाँपन्हा' म्हणण्याइतकेच अशक्यकोटीतले आहे, पहिला बाजीराव शूर होता यात शंका नाही, झाशीची राणी लक्ष्मीबाई ही शूर नव्हती असे केवळ एखादा मूर्ख माणूसच म्हणू शकेल, थोरले माधवराव पेशवेही शूर होते, राघोबादादाने नारायणरावाला गारद्यांकरवी मारले म्हणून रामशास्त्री प्रभुण्यांनी राघोबादादांना देहान्त प्रायश्चित्त फर्मावले, लॉर्ड बेंटिंकने हिंदुस्थानातील सतीची प्रथा बंद करवली, लॉर्ड माउंटबॅटन हे हिंदुस्थानचे अखेरचे व्हाइसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल झाले, लोकमान्य टिळक हे राजकीय पुढारी होते तर आगरकर हे समाजसुधारक होते, स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर देशभक्त होते, महात्मा गांधी हे अहिंसावादी होते, बाबासाहेब आंबेडकर अत्यंत अभ्यासू होते, जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले, तर मोहंमद अली जीना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल झाले. (थोडक्यात, नियम संदिग्ध आहे.)
मात्र (विशेषतः मराठी माणसाने मराठीत बोलताना) शिवाजीमहाराजांचा उल्लेख 'शिवाजी' असा एकेरी करण्यात काहीही गैर नाही. मराठीमध्ये 'शिवाजीमहाराज' असा (आदरार्थी बहुवचनयुक्त) उल्लेख आणि 'शिवाजी' असा एकेरी (परंतु तरीही आदरयुक्त) उल्लेख हे दोन्ही प्रघाताने सारखेच ग्राह्य आहेत. अशा एकेरी उल्लेखास विरोध हा अगदी अलीकडचा असून तो बिनबुडाचा आहे, आणि 'मराठी अस्मिते'च्या नावाखाली काही राजकारण्यांनी राजकीय स्वार्थाकरिता ठोकशाहीच्या आधारावर लादलेला एक नवीन निर्बंध यापलीकडे त्याला काहीही आधार नाही.
अवांतर: इंग्रजी संस्कृतीतील (?) 'सायमन सेज़' या खेळाच्या धर्तीवरील 'शिवाजी म्हणतो...' हा लहान मुलांचा खेळ माझ्या लहानपणी लोकप्रिय होता. अलीकडे त्याचे पुनर्नामकरण 'छत्रपती श्री शिवाजीमहाराज म्हणतात...' असे झाले असल्यास कल्पना नाही.