अशाच प्रकारे 'नाही निर्मळ मन, तेथे काय करील साबण'मधील साबणाच्या उगमाबद्दलही मला शंका आहेत. म्हणजे महाराष्ट्रात साबण कधीपासून वापरात आहे? महाराष्ट्रास साबणाची ओळख नेमकी कोणी, कधी आणि कशी करून दिली?
शब्दसाधर्म्याच्या कारणास्तव (इतर अनेक शब्दांप्रमाणे) 'साबण' हा शब्द ही पोर्तुगीज भाषेची मराठीस देणगी आहे अशी माझी समजूत होती. (कदाचित चुकीची असू शकेल. मोल्ज़वर्थभटजी अरबीकडे निर्देश करतो.) म्हणजे तुकारामाच्या - चुकलो! संत तुकाराममहाराजांच्या काळी आपण पोर्तुगीज मुलुखातून (किंवा कदाचित अरबांकडून) साबण आयात करीत होतो, की स्थानिक उत्पादन(सुद्धा) होत होते? आणि देशी साबणांना मागणी होती की इंपोर्टेड साबणाची फ्याशन होती? 'नाही निर्मळ मन...' मध्ये केवळ स्वदेशीचा पुरस्कार होता की विलायती चीजवस्तू परवडत नसल्याची खंत (आणि त्यातून उद्भवणारी 'द्राक्षे आंबट'वृत्ती) होती? तत्कालीन साबणांचे ब्राण्ड कोणकोणते होते? पैकी कोणकोणते ब्राण्ड तुकाराममहाराजांच्या दुकानी मिळत असत? (मुळात तुकाराममहाराज साबणांचे ष्टाकिष्ट होते का? 'नाही निर्मळ मन...' ही आपण साबणांचे ष्टाकिष्ट नसण्याची - 'आमचे दुकानी साबण मिळत नाही!' - खुलासेवजा मखलाशी होती, की दुकानी साबण विक्रीस ठेवत असूनसुद्धा स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेण्याची तुकाराममहाराजांची सर्वश्रुत अव्यवहारी वृत्ती होती? )
कधीकधी एक साधा शब्दसुद्धा आपल्या पूर्वसंस्कृतीच्या अनेक पैलूंबद्दलच्या (स्वतःच्याच) घोर अज्ञानाबद्दलची जाणीव करून देतो, तो असा!