मराठी भाषेत प्रचलित असलेल्या परकीय भाषेच्या सुळसुळाटाला शिवाजीने राज्यव्यवहारकोश करून चांगलाच शह दिला होता हे सर्वसाधारणपणे मान्य करण्यास कोणाचेही दुमत नसावे. ही गोष्ट खरोखरच खरी. इतिहासकार वि. का. राजवाड्यांच्या मते सन १६२८ मध्ये मराठी(+फ़ार्सी) पत्रलेखनात मराठी शब्दांचे प्रमाण १६२८ मध्ये शेकडा १४.४ टक्के होते, ते १६७७ मध्ये ६२.७ एवढे आणि १७२८मध्ये ९३.७ टक्क्यांपर्यंत वाढले. सध्याच्या लाखभर शब्दसंख्या असलेल्या मराठीत तुर्की-अरबी-फ़ार्सी शब्द फक्त २९००(२.९६%) आहेत. हे शिवाजी आणि सावरकरांचेच कर्तृत्व. सावरकरांच्या घणाघाती लिखाणामुळे त्यांच्या काळात मराठी तरुणांमध्ये आलेली मरगळ जाऊन त्यांचा स्वाभिमान जागृत(j A g R u t ) झाला.
इतके असूनसुद्धा मराठीतून फ़ार्सी शब्दांचे उच्चाटन झाले नाही. मराठीतले सध्याचे फ़ार्सी शब्द संस्कृत शब्दापेक्षा अर्थाची वेगळी छटा दाखवतात आणि त्यामुळे सररास वापरले जातात. (बाळासाहेब आणि बाळास्वामी यांचे अर्थ एक नाहीत). ते संस्कृत शब्दांपेक्षा उच्चारायला सोपेही आहेत.
शिवाजीपुरस्कृत शब्दकोशातील १० टक्केही शब्द टिकले नाहीत. सावरकरांनी इंग्रजी शब्दांसाठी तयार केलेले मराठी प्रतिशब्द रुळले, फ़ार्सी शब्दांसाठी केलेले रुळले नाहीत. आता तर काय, इतके इंग्रजी शब्द मराठीत घुसले आहेत की त्या अर्थाचे अचूक सोपे मराठी शब्द सापडणे कठीण होऊन बसले आहे. शेवटी हे इंग्रजी शब्दच त्यांचे मराठीकरण होऊन रुजणार.