धृतराष्ट्र :
"१) वासुकीचा पुत्र एक नाग. याच्या कुलात उत्पन्न झालेले नाग 'धृतराष्ट्रकुलोत्पन्न' अशा सामूहिक नावाने ओळखले जात असत. जनमेजय पारीक्षित (द्वितीय) राजाच्या सर्पसत्रात याच्या कुलातील पस्तीस प्रमुख नाग दग्ध झाले होते (महाभारत आदिपर्व ५२)
     मृतसंजीवक आख्यान - जैमिनि अश्वमेधमते पाताललोकी शेष नागाचा अनुचर म्हणून हा निवास करत असे. 'मृतसंजीवक' नामक मण्याच्या रक्षणाचे काम शेष नागाने याचेवर सोपवले होते. अर्जुनाच्या अश्वमेधीय दिग्विजयसत्रात त्याचा पुत्र चित्रांगदासुत बभ्रुवाहन याने त्याचा शिरच्छेद केला. अर्जुनास पुनः जीवित करण्यासाठी मृतसंजीवक मणी प्राप्त करण्याच्या हेतूने बभ्रुवाहन नागलोकी आला, आणि त्याच्याशी युद्ध करून त्याने तो मणी हस्तगत केला.
     अर्जुन पुनः जीवित होऊ नये यासाठी याने त्याचे मस्तक आपल्या पुत्रांकरवी पळवले, आणि ते बक दाल्भ्य ऋषींच्या आश्रमात लपविले. परंतु कृष्णाच्या मध्यस्थीने हा वाद सामोपचाराने मिटला (जैमिनि अश्वमेध ४९).

२) कश्यप आणि कद्रू यांचा पुत्र एक नाग (महाभारत आदिपर्व). नागांनी केलेल्या पृथ्वीदोहनप्रसंगी हा 'दोग्धा' बनला होता (महाभारत द्रोणपर्व परि. १.८.८०६). शिवरथाचा 'ईशादंड' म्हणून हा काम करीत असे (महाभारत कर्णपर्व ३४.७२).

 वरूणसभेत (महाभारत सभापर्व ९.९), तसेच बलरामाच्या परिनिर्वाणप्रसंगी (महाभारत मौसलपर्व ५.१४) हा उपस्थित होता. "

स्रोत : "भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोष (खंड १)
           लेखक : म. म. डॉ‌. सिद्धेश्वरशास्त्री  चित्राव