प्रतिसादाचे शीर्षक वाचून काहींना वेगळे वाटेल, पण खरोखर मला तसेच वाटते. आपण बहुतेकदा, राजकारण म्हणजे पक्षीय किंवा प्रसिद्धी माध्यमातून ज्याची रोजच चर्चा चालते ते, अशीच कल्पना करीत असतो. पण राजकारण हे केवळ एवढ्या मर्यादेत कधीच नसते. आपल्या नोकरीतल्या सेवकांची सहकारी सोसायटी, आपण जेथे राहतो तेथे सहकारी सोसायटी असेल तर तेथे, भीशी किंवा चिटफंडस, महिला मंडळे इतकेच काय  पण मॉर्निंग / इव्हिनिंग वॉकला जातायेताना भेटणारे, एकत्र बसून गप्पा मारणारे  यांच्यातही तुझं माझं, गटबाजी चालतेच. जेथे गट (किंवा समूह ) असतो, तेथे कमीअधिक प्रमाणात राजकारण असतेच. अशा राजकारण्यांना आपण स्वार्थी, अप्पलपोट्या, मतलबी अशा शेलक्या विशेषणांनी नावाजतो. दोन माणसं सतत एकत्र दिसत असतील, तर आपण त्यांचा उल्लेख जोडी, दुक्कल, अशा अनेक विशेषणांनी करीत असतो.  अशा विशेषणांमधून आपण अनेकदा त्यांच्या विषयीच्या आपल्या तीव्र भावनाच व्यक्त करीत असतो. आपल्या या भावना व्यक्त करण्याचा प्रकार वृत्तपत्रांमध्ये "अमुक यांनी तमुक यांच्यावर तीव्र टीका केली" अशा भाषेत प्रसिद्ध होत नाही एवढेच, पण आपली वृत्ती मात्र तीच, पक्षीय राजकारण्यांचीच असते. पक्षीय राजकारण्यांध्येही अनेक चांगले लोक असतात, अगदी आजदेखील आहेत. त्यामुळे सभ्य लोक राजकारणात टिकू शकणार नाहीत असे मला कधीही वाटले नाही. कदाचित त्यांच्या वाट्याला येणारा संघर्ष इतरांपेक्षा अधिक तीव्र असेल, अनेकदा अपयश येईल. पण राजकारणात यशापयश, संघर्ष या बाबी प्रत्येकाच्या वाट्याला कमी अधिक प्रमाणात येतच असतात. वाजपेयींसारखा सर्वसमावेशक समजला जाणारा माणूस सर्वांकडून स्वीकारला जातो, तसा एकटाही पडतो नि इंदिरा गांधींसारखी तीन-तीन पिढ्या राजकारणात असणाऱ्या कुटुंबात जन्माला येणारी व्यक्ती आणीबाणीनंतर निवडणुकीत सत्ता गमावून बसते नि फिरून पुन्हा पंतप्रधानपद मिळवू शकते. एकटे पडले तेव्हा वाजपेयी, इंदिरा गांधी सभ्य होते किंवा सत्तेत होते तेव्हा राजकारणी होते असे कधीच म्हणता येणार नाही. शेवटी राजकारण म्हणजे काही विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वापरलेले बरे-वाईट साधन किंवा केलेल्या भल्या-बुऱ्या हालचाली असतात. त्या पक्षीय पातळीवर असतात, तशा व्यक्तिगत किंवा आपल्या लहानशा समूहातही असतात. पूर्णतः नॉर्मल स्थितीत असताना लाचलुचपत ही अनैतिक गोष्ट आहे असे म्हणणारे आपण गरजेच्या वेळी चिरिमिरी द्यायलाही तयारच असतो. म्हणजे आपणही शेवटी राजकारणीच असतो. राजकारणात रस नाही/ राजकारण आवडत नाही असे म्हणणारे लोक मला आपल्यातले सर्वात श्रेष्ठ राजकारणी वाटतात. हे सारे लिहिण्याचा उद्देश एवढाच की कितीही नाकारले तरी राजकारण हे दैनंदिन जीवनाचाच एक भाग असतो हे लक्षात आणून देणे. तो कोणालाही टाळता येणारा नाही इतका नैसर्गिक नि सहजपणे आणि तितक्याच नकळतपणे आविष्कृत होणारा असतो.