'कोण येते पेरणीला'... प्रश्न हा शेतापुढे!
टाकुनी लेंड्या खताला, चालल्या मेंढ्या पुढे

मराठी कवितेला आता असे दिवस आले आहेत की शेताला खत भरपूर व्हावे पण पेरणीच होऊ नये. म्हणजे, 'कसे लिहू नये' याची  अमाप उदाहरणे झाली आहेत  पण त्याचा उपयोग करून 'कसे लिहावे' याचे एकही उदाहरण दिसत नाही.

रेडकाला हे कळेना 'मी कशाला जन्मलो'
खरवसासाठी म्हशीला बांधले रेड्यापुढे

निर्माण झालेल्या कवितांना काहीही भविष्य नाही. मात्र, निर्माण होत असताना त्या कविता कवीच्या दृष्टीकोनातून खूपच श्रेष्ठ असून त्याला जगभराची वाहवा मिळणार याबद्दल त्याची खात्री असते. त्याच कामनेने तो कविता करून टाकतो. अशी रेडके बांधून ठेवायला गोठा सोडाच, त्यांना घालायला चाराही नसतो. म्हणजे, कविता खितपत कुठल्यातरी जालीय पानावर पडून राहतात. त्या कवितांना हे कळत नाही की त्या का आहेत?

श्रावणामध्ये अनीती पाहुनी पळतोस तू?
भाद्रपद येणार आहे ईश्वरा याच्यापुढे

मुक्तछंदामुळे फुटलेले पेव अता इतके झाले की हतबुद्ध व्हावे. पण दिवसागणीक वाढत्या संख्येने अवतरणारे कवी पाहून 'आत्ताच धीर सोडणे योग्य नाही' असे स्वतःचे सांत्वन करावेसे वाटते.

'कायदा' आला नवा, बैलांत झाल्या चुळबुळी
'यापुढे कैसे चरावे मोकळ्या सांडापुढे?'

भारतात जसा कायदा आला तसा जर काव्यक्षेत्रात आला (कुणीही कुठल्याही कवितेवर धीटपणे मत व्यक्त करायला मोकळा आहे असा ) तर आजचे हे महान कवी कविता प्रकाशित करायला धजणार नाहीत. कारण त्यांना टीकेची सवयच नसते.

'बांधतो घरटे इथे, तिकडेच अंडी घालते'
'काय मी व्हावे कवी' हा प्रश्न कोकीळापुढे

'मी जिला माझी समजतो त्या माझ्या प्रतिभेला मी माझ्या प्रेमाचा स्वीकार करायचा आग्रह केल्यावर ती तो करते खरा, पण श्रेय दुसराच घेऊन जातो'! दुसरा श्रेय घेऊन जातो याचे कारण प्रतिभा चंचल असून पुढच्याच क्षणी ती दुसऱ्याची होते, मग तिला माझे प्रेम नकोसे वाटू लागते. आता मी कसे काय बुवा कवी व्हायचे? (कोकीळ पक्षाच्या दृष्टीकोनातून मात्र वेगळा अर्थ! माझी कोकीळा अंडी कावळ्याच्या घरट्यात घालतीय अन पैदाशीचे श्रेय कावळा लाटतोय. मला आता कवी व्हाव लागणार असे दिसतय! )

ही गजल होऊ शकते का?

बाराखडीप्रमाणे ही गजल आहे. बाकी विचार मांडून नवीन वाद नको व्हायला.

प्रतिसादकांचे व वाचकांचे आभार!

-बेफिकीर!