भोमेकाका,
 
मला काही मनोगतींच्या मते कविता म्हणजे फक्त छंदबद्ध लेखन होते हे माहित आहे.  म्हणूनच तुम्ही पानाच्या वर पाहाल तर त्यात कविता विभागात हे लिखाण टाकलेले नाही.
 
राहिला भाग इतरांनी याला कविता म्हणायचा, तर बऱ्याच भागांत आणि रसिकांमध्ये या प्रकाराला कवितेमध्येच टाकण्यात येते.  एक तर तुम्ही सुद्धा मान्य कराल की हा धडा नाही.  हे संपूर्णतः गद्य लिखाणासारख नाही.  यात सुद्धा वाचकाला लय सापडते, यमक सापडते, ते यमक नेमका प्रभाव पण मनावर उमटवते.  नसेल या लिखाणाला छंद, पण वाचक वर्ग बराच आहे.  माझ्या छंदोबद्ध कवितांपेक्षा या लिखाणाला जास्त अभिप्राय आहेत.
 
मला वाटते, छंदोबद्ध लिखाण आणि पद्य या दोघांच्या मध्यभागी मोडणारा हा प्रकार आहे.  या प्रकारात बऱ्याच मोठ्या मोठ्या साहित्यिकांनी लिखाण केलेय, कुसुमाग्रज, पाडगावकर, सुरेश भट, आणि बरेच कवी या प्रकारात लिहून गेलेत आणि लिहितात आहेत.  मग याला सोयिस्कर रित्या कविता याच नावाने संबोधले जाते.
 
मनोगतावर जर याला कविता म्हणायचे नसेल तर या प्रकारासाठी एक नवे नाव व एक नवा विभाग असावा.  माझ्या माहिती प्रमाणे मनोगताच्या प्रशासनाने अजुन तरी कशाला कविता म्हणायचे आणि कशाला पद्य याची नियमावली प्रसिद्ध केलेली नाही.  मग याचा अर्थ वाचकांनी, म्हणजेच मनोगतींनी स्वमताने या गोष्टी ठरवाव्या असे प्रसासनाचे धोरण दिसते. 
 
मी सुद्धा या प्रकाराला, कविता हा शब्द कळल्या पासून, कविताच म्हणत आलोय.  प्रवासी महोदयांशी बरेच बोलणे झाल्यावर मला त्यांचे आणि अजुन काही मनोगतींचे हे मत कळले की जी छंदोबद्ध तीच फक्त कविता म्हणावी आणि इतर प्रकारांना कविता म्हणू नये.  पूर्ण पणे नाही पटले कारण याला कविता म्हणण्यात माझी २० वर्षे गेलीत, म्हणजे बरीच चिव्वट सवय आहे ही.
 
पण याला एकदम गद्य म्हणायला सुद्धा मन धजावत नाही.  नाही म्हणता यातही एक गोडवा आहे.  बोलगाणी, म्हणजे कविता नाहीत असे म्हटले तरी त्याचे माधुर्य कायम राहतेच.  म्हणून याला लेख किंवा, कथा सुद्धा म्हणता येत नाही.  द्यायचाच असेल तर या प्रकाराला एक स्वतंत्र किताब द्या आणि मग माझी सोय होईल त्या विभागात या लिखाणाला टाकण्याची. 
 
हा विषय चर्चेला यावा अशी अपेक्षा आहे.  आपले मत सिद्धा जाणून घ्यायची ईच्छा आहे.  आणि प्रवासी महोदय, ॐ, आणि अनेक मनोगती जे हा अभिप्राय वाचत आहेत त्यांच्या कडून देखील मला विचार आदान प्रदानाची अपेक्षा आहे.
 
(गोंधळलेला) तुषार