१. महाराष्ट्रात मराठीतच शपथ घेतली पाहिजे म्हणताना महाराष्ट्र भारतात आहे हे माहीत असते याचा अर्थ वेगळा महाराष्ट्र हवा आहे असा का?
   वेगळा महाराष्ट्र मिळवणे कुणालाही शक्य नाही. ही बकवास दिशाभूल फक्त मराठी मतांसाठी आहे.

२. मनसे, शि‌. से वगैरे लोकांनी कधीही आयुष्यात अ-मराठी माणसांची काहीच मदत घेतली नाही का?

३. स्वतःच्या पक्षातील मराठी न बोलू शकणाऱ्या परंतु मते मिळवायला प्रभावकारक ठरणाऱ्या नेत्याला ते हाकलून देतात काय?

४. त्यांना काय वाटते की मारामाऱ्या फक्त त्यांनाच करता येतात?

५. भारताची सीमारेषा एकदा ठरल्यानंतर या असल्या प्रादेशिक मागण्यांना मुळात कायदेशीर आधारच नाही हे दुर्लक्षित केले जाते. बिहारचा माणूस अगदी बिनबोभाट महाराष्ट्रात येऊन पिढ्यानपिढ्या राहिला तरी ते कायदेशीर आहे. भारतात हिंदी कुठेही बोलता आलेच पाहिजे. स्वतःच्या मनगटात दम असेल तर स्वतः धंदे उभारून व चालवून मग गुजराती, दाक्षिणात्य, उत्तर भारतीय यांना असहाय्य करून दाखवा.

६. १३ सीटा आल्या याचा अर्थ वाटेल तसे वागण्याचा परवाना मिळाला काय?

७. मी स्वतः काँग्रेस, भाजप, शि‌. से, मनसे वगैरे कुठल्याही पक्षाला 'दूध का धुला' वगैरे समजत नाही. तेव्हा इतर कुठलाही गैरसमज होऊ नये.

८. मराठी, मराठी म्हणजे काय? ज्यांना मराठीचा अभिमान आहे ते जर स्वतःच ओरिसामध्ये तेथील कुटुंबात जन्माला आले असते तर त्यांना ओरिया भाषेचा अभिमान असता. मराठी भाषेवर संकट आहे असा एक हास्यास्पद प्रसार केला जातो. ते जे काही संकट समजले जात आहे ते परतवणे कुणालाही शक्य नाही याचे कारण वैश्विक एकात्मता ही संकल्पना उद्योगवाढ, शिक्षणाच्या व नोकरीच्या संधी यामार्गांनी प्राप्य झाल्यामुळे अर्थातच जगात जास्तीतजास्त बोलली जाणारी भाषा आपला प्रभाव टाकणार. हे जर मान्य केले तर ते संकट नसून तो सध्याच्या समाजातील एक प्रवाह आहे. उद्या जर हिंदी बोलणारे (भारतीय) यांची एकूण लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या ५०% झाली तर झकत जगात हिंदी शाळा काढाव्या लागतील. मराठी किंवा कुठलीही भाषा ही संपर्काचे व संवादाचे माध्यम आहे याचा विसर पाडणारी दाहक भाषणे केल्यानंतर टाईम्सला मुलाखती द्यायच्या याला काय अर्थ आहे? जे असा प्रसार करतात त्यांची अपत्ये कोणत्या माध्यमात शिकतात, दिवसातून कितीवेळा इंग्रजी किंवा हिंदी बोलतात, भ्रमणध्वनीवरील 'एस. एम. एस' ही सेवा कोणत्या माध्यमातून वापरतात, 'चॅटिंग' कोणत्या माध्यमातून किंवा लिपीतून करतात हे सिद्ध करायला सांगीतले पाहिजे. इतर भाषिक आपल्या राज्यात येऊन सहजी आपली भाषा बोलायला लागतात, निदान जुजबी तरी! ही असली संकटे (आम्हाला मुंबईत भाजी हिंदीत घ्यावी लागते अन रिक्षावाल्याला हिंदीत सांगावे लागते ) समाजासमोर आणणारे अन त्याचा मतांसाठी व स्वस्त प्रसिद्धीसाठी वापर करणारे यांना 'जिथे अजिबात मराठी चालत नाही अशा प्रदेशात तीन दिवस ठेवले तर ते अन्नपाणी परकीय भाषेत मागावे लागते म्हणून तहानलेले व भुकेले राहतील काय'?

वरील मते शुद्ध मराठी भाषेत (काही किरकोळ व माझ्या अज्ञानामुळे असलेले अपवाद सोडून, जसे एस. एम. एस) मांडता आली यासाठी मनोगतचे मनापासून आभार! तशीही, जर मराठी न चालणारे एखादे दुसरे स्थळ असते तर मी इंग्रजीत ही मते मांडलीच असती.

(संपादित : प्रशासक)