भारतात इंग्रजी बोलणारे अल्पसंख्य असतील पण समजणारे नाहीत. घरात काम करणाऱ्या मोलकरणीसुद्धा बऱ्यापैकी इंग्रजी समजू शकतात. बोललो तर चुकू या लाजेने माणसे इंग्रजी बोलत नाहीत.
इंग्रजी बोलण्याने निश्चित समानता प्रस्थापित होते. केंद्र सरकारच्या नोकरीत असताना अनेक अमराठी लोकांशी मैत्री झाली. माझी नोकरी नवीन असली तरी अनेकजण निवृत्तीच्या उंबरठ्यावर होते. त्यांतला एक ज्येष्ठ मद्रासी माणूस सद्गदित होऊन एकदा म्हणाला, 'इंग्रजांनी आपल्याला इंग्रजी शिकवून आपल्यावर केवढे उपकार केले आहेत. त्यामुळे आपणां सर्वांच्यांत एवढी मैत्री होऊ शकली, एरवी मला मराठी संस्कृती कशी असते याची कदापि ओळख झाली नसती.'
भारतीय भाषांच्या मानाने इंग्रजी शिकणे सोपे आहे; ती शिकायला अनेक साधने सहजगत्या उपलब्ध आहेत. व्यवहारात वापरण्यासाठी आणि जगात वावरण्यासाठी इतकी उपयोगी भाषा दुसरी नाही. बहुसंख्यांना इंग्रजी बोलता यायला लागले की समानता प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने एक पाऊल खात्रीने पुढे पडेल.
इंग्र्जी बोलता आले की लोक मातृभाषेत बोलणे थांबवतील हे परदेशांत राहणाऱ्या गुजराथी-पंजाबी आणि दक्षिणी भारतीयांना केव्हाच खोटे सिद्ध केले आहे.