शुद्ध आणि प्रमाणित भाषेऐवजी अशुद्ध बोलणार्‍याची जात समजते असे आपण म्हणता ते बरोबर नाही. भाषेवरून मनुष्य कुठल्या भागातला आहे ते समजते. ज्याला आपण शुद्ध आणि प्रमाण मराठी समजतो त्याला जवळ जाणारी भाषा कोकणातले सर्व जातीजमातीचे लोक बोलताना दिसतात तर देशावरचे अगदी ब्राह्मणसुद्धा जी भाषा बोलतात ती शुद्ध आणि प्रमाणित आहे असे म्हणता येईल याची खात्री नाही. म्हणूनच विदर्भ - मराठवाडा- पश्चिम महाराष्ट्रातले लोक "पुण्याची शुद्ध भाषा आम्ही का प्रमाण मानावी? " असा प्रश्न विचारतात.

एखादा माणूस जर आपल्या गावच्या बोलीभाषेत बोलत असेल तरच त्याच्या बोलण्यावरून तो कुठल्या भागातला आहे हे समजू शकते. याचा अर्थ एका भागातली सर्व माणसे एकाच प्रकारे बोलीभाषा बोलतात असेही नाही.  तिथेही  जात, वय, लिंग, शिक्षण, संस्कारांनुसार बोलण्याची भाषा बदलते. आजी आणि नातू यांची भाषा जिथे एक नसते, तिथ बाकींच्याचे काय?
दुर्दैवाने मराठीत काही जण प्रमाणभाषेला 'शुद्ध मराठी' म्हणतात.  आणि म्हणून भाषिक वादंग माजतात. वास्तविक तसा प्रकार नाही. बोलायची मराठी वेगळी असली तरी त्यांतली प्रत्येक बोलीभाषा शुद्धच गणली जाते.  लिहिताना मात्र एकाच प्रकारची मराठी असणे आवश्यक आहे, आणि त्या मराठीलाच प्रमाणित मराठी म्हटले जाते. आता ही प्रमाण मराठी, महाराष्ट्राच्या कुठल्यातरी भागाची बोली भाषा असू शकते.  केवळ आणि केवळ त्यासाठी, तिला कुणाचा विरोध असायचे कारण नाही.  दक्षिण लंडनच्या ज्या भागात अनेक नामवंत शिक्षणसंस्था आहेत, त्या भागात बोलल्या जाणाऱ्या भाषेलाच प्रमाण इंग्रजी समजतात. इंग्लंडमध्ये अन्यत्र बोलली जाणारी इंग्रजी प्रमाणभाषेपेक्षा वेगळी असू शकते.  मराठीचे आणि जगातल्या प्रत्येक भाषेचे अगदी तस्से आहे. --अद्वैतुल्लाखान