घराच्या रचनेपेक्षा घरातल्या लोकांमधला सुसंवाद घराबद्दल आपुलकी निर्माण करतो. एकदा तुम्हाला घरातून बाहेर पडूच नये असं वाटायला लागलं की प्रत्येक खोलीतलं सौंदर्य, तिथला आराम कळायला लागतो. तुम्ही त्या सुरेख रंगवता, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी सजवता. किचन, हॉल, वॉशरूम, बेडरूम प्रत्येक ठिकाण तुमची रमण्याची जागा होते. तुम्ही त्या घरात एक वातावरण निर्माण करता. दिशा ही सर्वस्वी मानवी कल्पना आहे त्यामुळे अमूक दिशेला तमूक रूम हवी असे काही नाही. घरात फक्त दोनच गोष्टी महत्वाच्या असतात एक म्हणजे सूर्यप्रकाश आणि दुसरी खेळती हवा. मग त्या घरात सुरेल वातावरण निर्माण करणं ही सर्वस्वी तुमची जवाबदारी असते. मी हे एवढ्यासाठी लिहलं की तुम्ही घरी सुखी नसाल तर दुसरीकडे कुठेही सुखी असण्याची शक्यताच नाही. वास्तूशास्त्रा पेक्षा घरातल्या लोकांचे संबंध घर निर्माण करतात.

संजय