राजहंसाचे चालणे । भूतळी जालिया शहाणे । आणिक काय कोणे । चालावेचिना ॥१८. १७१३॥
ज्ञानेश्वरांनी हे अगदी स्वत:विषयीच सांगून ठेवले आहे. अर्थात हा त्यांचा नम्रपणाच आहे. पण ज्ञानेश्वरांनाही तुझ्यासारखे वाटत नाही. आपण गीतेसारख्या महान ग्रंथावर टीका वा भाष्य करतोय हा मोठा अपराधच करतोय असे एकीकडे वाटत असतानाच ते आपले समर्थनही करतात की राजहंसाच्यासारखे चालणे प्रत्येकालाच थोडेच जमणार आहे पण म्हणून बाकी इतरांनी काय चालूच नये काय? थोडक्यात तुझे म्हणणे जे फक्त चांगले लिहिता येणाऱ्यानीच लिहावे नाहीतर उगीच कागद शाई यांची नासाडी करू नये याबाबतीत ज्ञानदेवानीच इतरानीही यथाशक्ति आपल्याला जमेल ते आणि जमेल तसे आपल्या आवडीचे काम करावे असाच संदेश दिला नाही का? "
याच ओवीचा मी लावलेला अर्थ असा. ज्ञानेश्वर सांगत आहेत "व्यास मोठे आहेत. पण मीही कमी नाही."
ज्ञानेश्वरांमध्ये स्वतःविषयी आत्मविश्वास किती होता हे मी आपल्याला सांगावे असे आहे का? बरीच उदाहरणे आहेत. "अमृतातेही पैजा जिंके । ऐसी अक्षरे रसिके मेळवीन॥", "परी अक्षरी सुभेदी । उपमा श्लेष कोंदाकोंदी । झाडा देईन प्रतिपदी । ग्रंथार्थेसी ॥" ही सुप्रसिद्ध उदाहरणे आहेतच पण एके ठिकाणी सद्गुरूंच्या कृपेने माझे श्वासही प्रबंध झाले असेही म्हटले आहे.
माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे उदाहरण म्हणजे "माझा ग्रंथ गीतेबरोबर वाचला तरी आवडेल. पण गीतेशिवायही स्वतंत्रपणे वाचला तरी तितकाच आवडेल. " "गीतेवाचूनही रंगू दावी।" इथे व्यासांशिवायही मी स्वतंत्रपणे माझ्या बळावर उभा राहू शकतो असे ते सांगतात असे मला वाटते.
विनायक