काय मराठी भाषा आहे! जरासा ल चा ळ किंवा न चा ण झाला की अर्थ बदलतो. आणि म्हणे, संस्कृतने केली  तशी आता मराठीनेही ळ ची हकालपट्टी करावी. श-ष-स ही तीन अक्षरे हवीत कशाला?  एकानेच काम भागवा. संस्कृतमधील ऱ्हस्व-दीर्घ-प्‍लुतंच्या ऐवजी आपण फ़क्त ऱ्हस्व-दीर्घाच्या खुणा ठेवल्या, त्याही कमी करून एकच ठेवा.(वाचा, महाराष्ट्र सरकारचे संस्कृति-धोरण किंवा शुभानन गांगल यांचे लिखाण). प्रत्यक्षात आपण चिन्हांनी दाखवतो त्यापेक्षा कितीतरी अधिक उच्‍चार आपल्याला करायला लागतात. गवतमधले तीन अ आपण वेगळे दाखवू शकत नाही. वाड़ा आणि डावा यांतले डचे  मराठीतले दोन वेगळे उच्‍चार, वेगळे दाखवायची सोय नाही. च-छ-ज-झ-ञ-फ तर सोडूनच द्या, पण ज्याअर्थी  ऱ्हस्व ऌ आहे त्याअर्थी  दीर्घ उच्‍चाराचा ॡ असायलाच पाहिजे, भले शब्द नसेनात का, हा विचार कुणी करत नाहीत. (ही आपण संस्कृतवर केलेली मात!) आजकालच्या शिक्षित लोकांना ड आणि ङ, त्र आणि ञ, रु आणि रू  यां अक्षरांमधला फ़रक माहीत नाही. संगणकांवर वापरायचे काही टंक असे आहेत की ते वापरून दोन वेगळे रु किंवा वेगळे ऌ टंकताच येत नाहीत. चंद्रकोरीच्या आकाराचा अर्धा र आता कळफ़लकावरून अदृश्यच झाला आहे. त्याच्या ऐवजी डॅश वापरावा लागतो. सहसा न लागणारे नुक्ताधारी र, व, ळ, आणि य आता सहज टंकता येतात, मग च-छ-झ नेच काय पाप केले आहे? जास्तीतजास्त उच्‍चार दाखवण्याच्या सोयीसाठी गरज़ेनुसार अक्षरचिन्हे वाढवायची, की आहेत तीच कमी करायची?