सुवर्णमयी,
गझलेचे शीर्षक वाचून खूप अपेक्षा निर्माण झाल्या होत्या, पण गझल वाचल्यावर माझी काहीशी निराशाच झाली, ते मुख्यत्वे करुन अश्यामुळे की-
१) लय आणि वृत्तातील काही दोष जे गझलेच्या प्रकृतीला मारक ठरलेत
२) काही शेरांचा आशय मला फारसा भावला नाही, कळ्लाही नाही
ल गा, गा गा, ल गा, गा गा(२ वेळा) हा लग क्रम असावा असे वाटते
तुला बोलावतो सागर तुला बोलावती वाटा
तुझ्या माझ्यामधे आहे किती अंतर किती लाटा...हे कोण कुणाला म्हणते आणि का ते विचार करुनही कळले नाही.

तुझ्या माझ्या कधी झाल्या म्हणे गप्पा जिव्हाळ्याच्या
कुठे ती ऊब गेली? का असा केलास बोभाटा?-आशय उतम पण ह्या ओळीत लय बिघडली आहे हे जाणवते

फुलांना त्रास मी नाही दिला ना बोललो काही
कशाचा दंश झाला मज? ...कुणी हा टोचला काटा.. पुन्हा लय

जरा ऐकून तर घे ना म्हणे म्हणणे कुणाचे तू....
(तसे केले कधी मी तर कुणी फोडायचा फाटा?).. ह्या शेरातील आशय मात्र मला अतिशय भावला

इथूनच बघ उद्या होतील अपुल्या वेगळ्या वाटा
दिवस लक्षात्,तू स्मरणात ,आठवणीत हा फाटा.. लय/यतिभंग?

उधाणाच्या मिषाने ही किती झाडे बहकलेली .........
ठिकठिकाणी उडाला दूर पाचोळाच उफराटा!.. लय.. आणि आशय नीटसा कळला नाही

मी तुमच्या रचना गेली ४-५ वर्षे झाली वाचतोय. एक नमूद करावेस वाटते की चांगल्या गझलेकरिता आवश्यक असलेले काव्य-गुण असून सुद्धा केवळ वृत्तातील दोषांमुळे आपल्या रचनेत एक कमतरता राहून जाते.
माझा एक अनुभव आपल्याशी शेअर करावा म्हणतो, एक एक्ज़रसाइज़ म्हणा हवे तर
आपण ह्या वृत्तात लिहिण्याचा सराव करुन बघावा
गा ल गा ल गा ल गा ल गा ल गा ल गा
आ ज गो कु ळा त रं ग खे ळ तो ह री
रा धि के ज रा ज पू न जा तु झ्या घ री
अगदी काटेकोरपणे ह्याच वृत्तात लिहून बघावे, अजिबात सूट न घेता, लघुच्या ठिकाणी लघु आणि गुरुच्या ठिकाणी गुरुच यायला हवा. एका गुरुचे दोन लघु करायचे नाहीत.
ह्याऐवजी ल गा ल गा .... असेही वृत्त निवडले तरी चालेल.
तुला तिला असे ऋतू पुन्हा कधी मिळायचे..असा श्री. चित्त ह्यांचा एक मिसरा आहे ह्या वृत्तात.
माझा असा अनुभव आहे की ह्या ए्क्ज़रसाइज़मुळे बराच फायदा होतो.
वरील टिप्पणी चांगल्या हेतूने केलीय, कृपया गैरसमज नसावा
शुभेच्छा!
-मानस६