कथा आवडली, परंतु कथेखाली कथेचे तात्पर्य स्पष्टपणे लिहिलेले नसल्याकारणाने यातून नेमका काय बोध घ्यावा हे गूढ लक्षात न येऊन संभ्रम निर्माण झाला. तात्पर्य दिले असते तर अतिशय प्रभावी बोधकथा होऊ शकली असती; तूर्तास स्पष्ट तात्पर्याअभावी गूढकथा झाली आहे. निरनिराळ्या प्रकारचे (आणि प्रसंगी परस्परविरोधीही) संभाव्य बोध सुचले. पैकी नेमका कोणता अभिप्रेत आहे (अथवा याहून वेगळा कोणता अभिप्रेत आहे अथवा यातून कोणताही बोध घेणे अपेक्षित नाही) याचा कृपया खुलासा व्हावा.
- साक्षरतेचे महत्त्व या कथेतून अधोरेखित होते. किंबहुना साक्षरताप्रसारमोहिमेत, साक्षरतेचा प्रचार करताना ते पटवून देताना दाखला म्हणून वापरण्याकरिता ही कथा उत्कृष्ट आहे.
- ज्ञान हीच सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. या कथेतील 'ति'ला
(अ. ) लॉटरीचे तिकीट म्हणून काहीतरी असते,
(ब. ) त्याचे निकाल वर्तमानपत्रांतून छापून येतात,
(क. ) असे एक तिकीट आपल्याकडे आहे, आणि
(ड. ) त्याचा निकाल असलेला वर्तमानपत्राचा तुकडाही आपल्याकडे आहे
याचे केवळ ज्ञान नसल्याने एक विजेते लॉटरीतिकीट जवळ असूनही 'ति'ने ते फेकून दिले. ते ज्ञान असते तर त्या पाकिटातून मिळालेल्या नोटांपेक्षा खूप मोठा धनलाभ 'ति'ला झाला असता. (यातूनच योजकस्तत्र दुर्लभः हा बोनस बोधसुद्धा होतो. )
- अज्ञानात आनंद असतो. (हा बोध याआधीच्या बोधाच्या सपशेल विरोधात आहे.) 'ति'ला आपल्याकडे विजेते लॉटरीचे तिकीट आहे आणि त्यातून आपल्याला कल्पना न करता येण्याइतके भरपूर पैसे मिळू शकतात याचा गंधही नाही. त्यामुळे:
(अ.) 'ती' पोटभर मिसळ आणि बटाटेवड्यांचा आनंद उपभोगू शकत आहे.
आपल्याकडे भरपूर पैसे आहेत याचे जर 'ति'ला ज्ञान असते, तर:
(१) (पार्किन्सनच्या नियमाप्रमाणे) ते कसेकसे खर्च करावेत, आणि
(२) ते चोरांपासून सुरक्षित कसे ठेवावेत, शिवाय
(३) इनकम टॅक्स, तो टाळण्याकरिता (किंवा किमानपक्षी कमी करण्याकरिता) गुंतवणूक, वगैरे वगैरे भानगडी
या चिंतांपायी 'ति'ला मिसळ आणि बटाटेवडे गोड (किंवा खरे तर तिखट) लागले नसते. शिवाय नवश्रीमंतीच्या आपल्या या नव्या 'स्टेटस'
(मराठी?)च्या जाणिवेपायी कदाचित 'ति'ला रस्त्यावरील मिसळ आणि बटाटेवडे खाणे कमीपणाचेही वाटले असते.
(ब. ) ते लॉटरीचे तिकीट आपल्याकडे आहे, आणि ते दुर्लक्षिल्यामुळे आपण काहीतरी मोठे गमावत आहोत हे 'ति'च्या गावीही नसल्याकारणाने ते गमावल्याचे दुःखही 'ति'ला नाही. आणि त्याचमुळे 'ती' निर्विकार आहे, आणि आजच नव्हे, तर उद्याही (नोटांचे पैसे शिल्लक राहिले तर) आनंदाने मिसळ आणि बटाटेवडे खाऊ शकेल. (उलटपक्षी उद्या यदाकदाचित आपण काय गमावले हे जर 'ति'ला कळले, तर उद्याच काय, पण कदाचित उरलेल्या आयुष्यातसुद्धा 'ती' पुन्हा आनंदी होऊ शकणार नाही.)
- अर्धवट ज्ञान धोकादायक असते. (हा बोध याआधीच्या दोन बोधांच्या विरोधात आहे.) 'ति'ला 'नोटा म्हणजे पैसे असतात' एवढेच ज्ञान आहे. 'लॉटरीचे तिकीट म्हणजेसुद्धा (क्वचित्प्रसंगी जर लागले तर) पैसे असू शकतात, आणि निव्वळ पाकिटातल्या मूठभर नोटांपेक्षासुद्धा पुष्कळ अधिक पैसे असू शकतात' (आणि 'आपल्याला मिळालेल्या पाकिटात असे तिकीटही आहे') हे ज्ञान 'ति'ला नाही. त्यामुळे आयते पाकीट मिळाले असता त्यातील तुलनेने कमी किमतीच्या नोटा ठेवून घेऊन विजेते लॉटरीचे तिकीट असलेले पाकीट (ते तिकीट विजेते आहे हे दाखवून देणारा कागद पुढ्यात असूनही) 'ती' मुलाला खेळायला देते, पर्यायाने फेकून देते.
- अपात्री दान करू नये. ते हमखास वाया जाते. विजेते लॉटरीचे तिकीट कशाशी खातात (मिसळीकरिता चमचा म्हणून नव्हे) हे समजण्याची पात्रता नसलेल्या व्यक्तीस ते (या ठिकाणी नियतीने) दान करूनही काही उपयोग नसतो; अशा व्यक्तीच्या हाती त्याचा केवळ पोरखेळ होतो. (बोनस: दैव देते आणि कर्म नेते.)
- केवळ भरपूर पैसा ओतल्याने कोणतीही समस्या सुटत नाही. जेथे पैसा ओतायचा तेथे तो ग्रहण करण्याची क्षमता नसली तर तो पैसा निव्वळ कचऱ्यात जातो.
तूर्तास एवढेच सुचले. (सोने आणि माती आम्हा समान ते चित्ती आणि मार्क्सवादाशी निगडित क्षमतेनुसार काम आणि गरजेनुसार पैसा या तत्त्वांचा या कथेशी दूरान्वयाने काही संबंध लागतो का ते तपासत होतो, परंतु (१) या कथेतून हे बोध निघू शकत नाहीत, आणि (२) काही संबंध लागत असेलच तर ही कथा या बोधांच्या - विशेषतः उपरोल्लेखित मार्क्सवादी तत्त्वाच्या - काहीशी विरोधातच जाते, असे प्राथमिक तपासणीवरून वाटले. चूभूद्याघ्या. )