या निमित्ताने हे  पहिलेवहिले सर्वलिंगी नाम मला मिळाले.  आता आणखी उदाहरणे शोधायला हुरूप येईल.
बोलीभाषेत लिखाण करण्याचा हट्टाग्रह धरला की  शिक्रण, सुग्रण सारखे लेखन दोष होतात. एखादी भाषा जेव्हा निर्माण होते तेव्हा
तिची सुरुवात अनेक बोलीभाषांच्या संयोगाने होते हे सर्वज़ण  ज़ाणतात.  जेव्हा मोठ्यातमोठा जनसमूह बोलीभाषांचे एक विशिष्ट
मिश्रण असलेली भाषा बोलायला लागतो, तेव्हा प्रमाणभाषा जन्माला येते.  विद्वान एकत्र बसून किंवा एकेकटे, तिच्या शुद्ध
स्वरूपाची मांडणी करतात आणि तिच्यात लिखाणाला आरंभ होतो.  विद्वान लोकांनी प्रमाणभाषेत लिहिणेच नव्हे तर बोलणेही अपेक्षित
असते.  अर्थात हे फक्त भाषेच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात. त्यानंतर प्रमाणभाषा ज़वळज़वळ स्थिरावते आणि विद्वानांसकट
सगळ्यांच्याच बोलीभाषा डोके वर काढतात. विद्वानांची बोलीभाषा प्रमाणभाषेच्या आश्रयाने राहते, आणि इतर बोलीभाषा जराशा दूर
असतात एवढेच.
प्रमाणभाषेप्रमाणे बोलीभाषा शुद्धच असतात. त्यांनाही व्याकरण असते. पण फ़रक एवढाच की बोलीभाषा लिहिण्याच्या
कामाला येत नाहीत. आपापसात बोलण्यासाठी आणि एखाद्याच्या तोंडचे प्रत्यक्ष शब्द ज़सेच्यातसे लिहिण्यापुरताच त्यांचा उपयोग. 
लेखन, विशेषत: वैचारिक लेखन म्हटले की ते प्रमाणभाषेतच असले पाहिजे असा दंडक.
आपण सर्वज़ण ज़ाणतोच की, मराठी शब्दांतले क्रमाने दुसरे येणारे अक्षर बोलताना कमीजास्त दीर्घ उच्चारले ज़ाते. गवत(गवऽत्),
भांडण(भांडण्), शिकरण(शिक्‌रण्). परंतु उपकरण(उप-करण्),गुण(गुणऽ किंवा गूण्) तसेच हित(हीत्) वगैरे. असे असले तरी
व्यास-पीठावर(व्यास्‌पिठावर) बसून जनता शब्दाचा उच्चार जन्ता करणे आता आम झाले आहे. अशाच प्रकारे, लोकसत्तेला लोक्सत्ता
म्हणणे यासारखे उच्चारदोष लिखाणात अवतरतात.  मराठी व्यक्तिनामांचे इंग्रजी स्पेलिंग मराठीतल्या उच्चाराप्रमाणे होत असल्याने
जेव्हा तो इंग्रजी शब्द परत देवनागरीत लिहिला ज़ातो तेव्हा हलन्‍त उच्चारलेले व्यंजन जोडाक्षराच्या आरंभी येते आणि हात्कणंग्लेकर
सारखे लिखाण होण्याचा धोका उद्भवतो.
याला एकच उपाय!  बोलीभाषेत न लिहिता प्रमाणभाषेतच लिहिणे आणि लिहिलेले वाचताना वाटल्यास  बोलीभाषेत वाचणे. इंग्रजी
वाचताना आपण असेच करतो. ज़ो तो आपापल्या पद्धतीने उच्चार करतो.
पुणेरी बोलीभाषेत लिहिताना एकारान्‍त नपुंसकलिंगी शब्द अंकारान्‍त होतात. मात्रांच्या जागी अनुस्वार टंकताना कधीकधी थोडीफ़ार गफ़लत होतेच. आता हेच पहा :-
मनोगतावर एका बालरोतज्ज्ञाची अतिशय सुंदर मुलाखत आहे. मुलाखत असल्याने ती (पुणेरी) बोलीभाषेत आहे.  असे असले की अनुस्वारांची गल्लत होणारच.  बाळांचं, बालवाडीचं, भावंडं, मूल, त्रिवेदींचं, आठ-नऊ रुग्णांचं, त्या वेळचं हे शब्द अनुस्वार चुकल्याने अनुक्रमे बाळांच, बालवाडीच, भावंड, मुलं,  त्रिवेदीच, रुग्णाचं, त्यांवेळचं असे सदोष उमटले आहेत. अशा वेळी वाटते, प्रमाणभाषेत लिहाण असते तर चुका टाळता आल्या असत्या.--अद्वैतुल्लाखान