यातून "ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही, पण गुण लागला" असे होऊ नये, एवढेच वाटते.

स्पर्धा तुल्यबळांत नसेल, प्रस्थापितांच्या आणि नवागताच्या दर्जांत प्रचंड तफावत असेल आणि त्यामुळे तुलनेने वरचढ नवागतास प्रभावी स्पर्धेअभावी आयते 'कॅप्टिव मार्केट' (मराठी?) मिळण्यात परिणती होणार असेल, तर हे होणे अशक्य नाही. (चौथ्या क्रमांकाच्या मुद्द्यात व्यक्त केलेली भीती  ही विद्यापीठ परदेशी असले तरी शिक्षक भारतीयच असल्यामुळे नव्हे, तर बाजारपेठेच्या आणि स्पर्धेच्या स्थितीच्या या कारणामुळे सार्थ वाटते.)

तसेही परदेशी विद्यापीठांतसुद्धा किडक्या किंवा बोगस दुकानांची कमतरता नाही. (उलटपक्षी सर्वच भारतीय विद्यापीठे ही किडकी किंवा कुचकामीही नसावीत; पण तो स्वतंत्र मुद्दा आहे.) त्यामुळे (परदेशी विद्यापीठांना भारतात प्रवेश देण्याच्या प्रक्रियेच्या) नियंत्रकांच्या उडदामाजी काळे-गोरे करण्याच्या क्षमतेवर, पात्रतेवर आणि राजकीय इच्छेवर बरेच काही अवलंबून राहील, असे वाटते.

ग्राहकांचा चोखंदळपणा आणि ग्राहकांची, एकंदर समाजाची आणि शासनाची जागरूकता (अवेअरनेस) हाही एक महत्त्वाचा घटक आहे. आणि या घटकाच्या बाबतीत भारतातल्या परिस्थितीबद्दल निदान मी तरी प्रचंड साशंक आहे. (पूर्वी पाश्चात्य आंतरराष्ट्रीय औषधकंपन्या पाश्चात्य देशांत विक्रीस बंदी आलेली औषधे 'तिसऱ्या जगा'तील देशांतील तत्सम बंदीच्या किंवा तिच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अभावी तेथील बाजारपेठांत सर्रास 'आदळत' असत, तशासारखा प्रकार या बाबतीत होऊ नये असे वाटते. किंवा अगदी नेमका तसा प्रकार घडला नाही तरी 'परदेशी' लेबलाखाली कमी प्रतीचा माल -कदाचित विद्यापीठाच्या मूळ परदेशी कँपसवरील 'प्रमाण' मालापेक्षा दुय्यम प्रतीचा माल - खपवला जाऊ नये असेही वाटते. परंतु याकरिता चोखंदळपणास आणि जागरूकतेस पर्याय नाही.)

तसेही (१) (चांगल्या दर्जाच्या) परदेशी विद्यापीठांच्या स्पर्धेमुळे किडकी देशी दुकाने बंद पडतील, किंवा (२) परदेशी विद्यापीठांनी भारतात चांगला दर्जा पुरवला नाही तर त्यांना दुकान बंद करावे लागेल, यां दोन्हीपैकी कोणतेही गृहीतक मानण्याचे काही कारण निदान मला तरी दिसत नाही.

यांपैकी पहिल्या गृहीतकाबाबत बोलायचे झाल्यास, भारतात काहीही झाले तरी उल्हासनगरच्या किंवा लाजपतराय मार्केटच्या उत्पादनांकरिता एका प्रकारची बाजारपेठ ही कायम उपलब्ध असतेच, आणि चांगल्या प्रतीच्या उत्पादनांच्या स्पर्धेमुळे तिच्यावर काहीही फरक पडत नाही, हे नम्रपणे दर्शवू इच्छितो.

दुसऱ्या गृहीतकाच्या विरोधात किमान दोन कारणे लक्षात येतात. एक म्हणजे केवळ 'परदेशी' लेबलासाठी इतर कशाचाही विचार न करता वाटेल ते विकत घेणारा एक किमान ग्राहकवर्ग भारतातून अजून नामशेष झाला असावा असे वाटत नाही. (शिक्षणाच्या बाबतीत तर नसावाच नसावा. केवळ चांगल्याच नव्हे, तर अगदी तृतीय दर्जाच्यासुद्धा ऑस्ट्रेलियन शिक्षणसंस्थांकरिता बऱ्या प्रमाणात भारतीय ग्राहकवर्ग मिळतो हे आणखी कशाचे द्योतक असू शकत नाही. यात 'ऑस्ट्रेलियात मागच्या दाराने प्रवेश' हासुद्धा काही अंशी एक घटक असला, तरी 'फॉरेनच्या डिग्रीचे आकर्षण' हा भाग नाकारता येणार नाही. आणि जेथे ती 'फॉरेनची डिग्री' खरोखरच तितक्या दर्जाची असते तेथे प्रश्न नाही, आणि त्या परिस्थितीत त्या आकर्षणात काही गैरही नाही, परंतु 'डिग्री फॉरेनची' आहे म्हटल्यावर बाकी कसलाही विचार न करणारा एक मोठा ग्राहकवर्गही भारतात अजून अस्तित्वात आहे, एवढेच यातून मांडायचे आहे.) दुसरे म्हणजे, भारतीय विद्यापीठे भारतीय बाजारपेठेत पुरवत असलेल्या शैक्षणिक दर्जापेक्षा किंचित्मात्र ('मार्जिनली' अशा अर्थी) अधिक (पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या किंवा मूळ परदेशी कँपसच्या तुलनेत दुय्यम) दर्जा पुरवूनसुद्धा परदेशी विद्यापीठे भारतीय बाजारपेठेत सहज टिकून राहू शकतील. भारतातील ग्राहकवर्ग देण्यास तयार राहील (परंतु तरीही परदेशी विद्यापीठास नफेशीर पडेल) अशा प्रकारचा शुल्कदर अशा कोणत्याही विद्यापीठाने भारतीय बाजारपेठेत आकारल्यास हे सहज शक्य होईल. आणि असा शुल्कदर हा परदेशी कँपसमधील शुल्कदर अधिक परदेशात राहण्याचा खर्च अधिक जाण्यायेण्याचा खर्च यांच्या तुलनेत बराच कमी येत असेल, शिवाय परदेशी विद्यापीठाची पदवी मिळत असेल (आणि जमल्यास भारतीय विद्यापीठांच्या तुलनेत अशा शिक्षणाचा दर्जा हा किंचित्मात्र का होईना, पण उजवा असेल) तर एक किमान ग्राहकवर्ग तर हमखास मिळेलच मिळेल. आणि हा किमान ग्राहकवर्गसुद्धा बऱ्यापैकी मोठा (हा सगळा प्रकार नफेशीर होण्याइतका मोठा) राहू शकेल अशी शंका येते.

(तिसरी गोष्ट म्हणजे, केवळ परदेशी विद्यापीठांच्या स्पर्धेमुळे भारतीय विद्यापीठांचा दर्जा आपोआप सुधारेल याही गृहीतकास फारसा आधार मला दिसत नाही. भारतीय विद्यापीठांचा दर्जा जेथे कमी पडतो, तेथे त्यामागे दोन कारणे असू शकतील. एक म्हणजे (कदाचित काही ठिकाणी आणि काही प्रमाणात) स्पर्धेच्या अभावामुळे दर्जा सुधारण्याची अनिच्छा ('चलता है, हिंदुस्तान है' वृत्ती), आणि दुसरे म्हणजे पुरेशा संसाधनांचा अभाव. (या 'पुरेशा संसाधनांच्या अभावा'मध्ये एकंदर संसाधनांची कमतरता किंवा अनुपलब्धता, संसाधनांकरिता वित्ताची कमतरता, उपलब्ध संसाधनांची नासाडीमुळे अनुपलब्धता, संसाधने उपलब्ध करून देण्यामागील राजकीय इच्छेच्या अभावामुळे येणारी कमतरता ही किंवा यांसारखी अनेक कारणे असू शकतील किंवा नसतीलही.) स्पर्धा आल्यामुळे यातील पहिल्या घटकावर फरक पडेलही, पण दुसऱ्या घटकाचे काय?

शिवाय, ही स्पर्धा येणार ती कोणकोणत्या क्षेत्रांत येणार? मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, वैद्यक, व्यवस्थापनशास्त्र, आर्किटेक्चर (वास्तुकला?) या क्षेत्रांत फार तर? आणखी कशाकशात येणार? फारच झाले तर इंग्रजी भाषा आणि साहित्य? शंकास्पद आहे. आणि मग जेथेजेथे स्पर्धा येईल तेथेतेथे दर्जा सुधारेल असे गृहीत धरायचे म्हटले, तर मराठी, इतिहास, भाषाशास्त्र, राजनीतिशास्त्र, एकंदर समाजविज्ञान, पुरातत्त्वशास्त्र वगैरेंचे काय? तेथे परदेशी विद्यापीठे स्पर्धेत उतरणार आहेत काय? या क्षेत्रांत त्यांनी स्पर्धेत उतरण्याएवढी बाजारपेठ भारतात आहे काय? आणि मग अशा स्पर्धेअभावी या क्षेत्रांतल्या शिक्षणाच्या दर्जाचे कसे होईल?)

या सर्वातून परदेशी विद्यापीठांच्या भारतातील आगमनाला किंवा स्पर्धेला विरोध करण्याचा उद्देश नाही, आणि स्पर्धेतून कदाचित काही प्रमाणात फायदा होऊ शकेल हे नाकारायचेही नाही. केवळ, अशी स्पर्धा येत आहे म्हणून आनंदोत्सव साजरा करण्याची घाई मी इतक्यातच करणार नाही, एवढेच म्हणायचे आहे. शिवाय, पाश्चात्य विद्यापीठांच्या स्पर्धेबरोबरच, भारतीय विद्यापीठांची संसाधनांची परिस्थिती सुधारणे हेही भारतीय विद्यापीठांच्या प्रगतीकरिता केवळ इष्टच नव्हे, तर बहुधा आवश्यक ठरावे, हा दुसरा मुद्दा मांडायचा आहे.

एकूण विचाराअंती, 'सद्य परिस्थितीत बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने करण्यात येत असलेला एक प्रयोग' या दृष्टिकोनातून याकडे पाहण्याकडे माझा कल होतो. नियंत्रित स्वरूपात असे प्रयोग करण्यात काही गैर आहे असे मला व्यक्तिशः वाटत नाही, आणि 'सद्य परिस्थितीत बदल घडवून आणणे' हा अशा प्रयोगामागील हेतू (असल्यास) स्वागतार्हच आहे. तसेही असे वेगवेगळे प्रयोग करत राहिल्याशिवाय समाजात बदल होऊ शकतो असे वाटत नाही, आणि दीर्घ काळाकरिता 'जैसे थे' परिस्थिती (स्टेटस क्वो) असणे हे कोणत्याही समाजाच्या प्रगतीकरिता हितकारक असते असे वाटत नाही. त्यामुळे सद्‌हेतूने आणि काही किमान पूर्वविचारांसहित केलेल्या प्रयोगांस आक्षेप किंवा विरोध असण्याचे काही कारण नसावे. मात्र एकदा प्रयोग म्हटले, की अनुमाने अगोदरच काढता येत नाहीत, त्याकरिता प्रयोग पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी लागते, आणि प्रयोगातून नेमके काय निष्पन्न होईल याबद्दलचे आगाऊ अंदाज चुकीचे निघण्याची शक्यता ही शून्य नसते, याही गोष्टी ध्यानात घेणे इष्ट असावे.