विजय,
आयुर्वेदानुसार वात, कफ आणि पित्त अशा तीन प्रकृती आहेत. प्रत्येकाच्या शरीरात या त्रिदोषांपैकी एक दोष हा अधिक तीव्र असतो. पित्त प्रकृती असणाऱ्याला तेलकट मसालेदार सहन होत नाही (आवडत नाही असे नाही) तेच कफ प्रकृतीवाला कितीही तेलकट पचवू शकेल. आपण अनेक गार पदार्थ सहज रिचवू शकाल पण कफ प्रकृती असणाऱ्याला मात्र गार पदार्थाने लगेच सर्दी भरेल. जन्मासोबत मिळालेली प्रकृती ही अनेकदा अनुवांशिक असते व ती बदलता येणे अशक्य असते.
आपली प्रकृती ही पित्तप्रधान असावी.
मलाही काही प्रमाणात आम्लपित्ताचा त्रास आहे.. किंबहुना होता.. कारण आता खूप प्रमाणात कमी झाला. विशेषत: दुपारच्या वा रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपणे या कारणामुळे अपचन / आम्लपित्त व्हायचे. मग काहीही खाल्ले तरी उलटून पडायचे. सकाळी अनुषापोटी १ लिटर कोमट पाण्यात थोडे मीठ टाकून वमन करणे हा एक चांगला उपाय आहे. जिरे पूड टाकून कोकम सरबत घेण्यानेही पित्ताला आळा बसतो.
नंतर योगाभ्यास शिकून नियमित योग आणि प्राणायाम करू लागल्यापासून अपचन व पित्त कमी झाले.
आपण दोन्ही जेवणानंतर १५ मिनिटे नियमितपणे वज्रासनात बसण्याचा प्रयोग करू शकता. वज्रासन हे जेवणानंतर करायचे एकमेव आसन आहे व त्यामुळे अन्नपचनास मदत होते. कारण पायाकडे जाणारा रक्तप्रवाह अडून तो पचन संस्थेकडे जातो. आपण परदेशात असल्याने तिथे भारतापेक्षा उत्तम हवामान असेल.. मोकळ्या हवेत फक्त अर्धा तास कपालभाती, अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम करून पहा..त्याला अग्निसाराचीही जोड द्या. त्यामुळे पचन व्यवस्था मजबूत होते.
अपूर्ण, अशांत आणि सतत मोडणारी झोप हे देखील आम्लपित्त होण्यास कारण होऊन शकते. अखंड झोप मिळेल असे पाहा. जागरण टाळलेले उत्तम आणि अर्थात वर सुचवल्यानुसार पथ्य पाळणे..
असे काही सोपे उपाय केल्यास पित्त-अपचन होणारच नाही... किंवा नियंत्रणात राहिल.
पित्तशमनाचे उपाय करण्यापेक्षा ते होऊच न देणे हे केव्हाही श्रेयस्कर...कारण..Prevention is always Better than Cure.
तरी ज्यांनी ज्यांनी उपाय सुचवले आहेत त्यांचे मी ही आभार मानतो...
विजय , मी माझा अनुभव शेअर केला.. मी काही वैद्य किंवा डॉक्टर नाही पण अनुभवाचे बोल आपल्यालाही उपयोगी पडतील अशी आशा आहे...आपणही करून पाहा.. आणि गुण पडल्यास जरूर कळवा..
शुभेच्छा!
- मंदार