अनेकदा व्यक्ती आवडलेली नसते म्हणून अपेक्षा वगैरे मनात येतात
का हा प्रश्न माझ्यापुढे उभा राहतो. कारण प्रेमात पडतांना सगळेच अगदी
डोळसपणे आंणि तोलून मापून प्रेमविवाह करत नाहीत. पण लग्न झाल्यावर मात्र ते टिकवण्याचा प्रयत्न करतात. मग दाखवून ठरवून केलेल्या विवाहाला मात्र का अशा अडचणी येतात? हा प्रश्न एकंदरीत फार गुंतागुंतीचा आहे हे नक्की.
अरेंज मॅरेज करायचे ठरले असेल तर दोघांनीही तडजोड करता येणार नाहीत अशा मुद्दयांची यादी करून ठेवावी, वास्तवतेच्या पट्टीवर घासून पाहावी. ती मान्य करणारे स्थळ मिळाले तर उत्तम नाही तर काही काळाने एखाद्या प्रोजेक्टमध्ये कसे आपण तपासून पाहतो काय कमी आहे, काय चुकत आहे तसा आढावा घेऊन आपले वय, बदलेली आर्थिक आणि घरातली परिस्थिती लक्षात घेऊन मुद्द्याचा फेरविचार करावा आणि त्यानुसार वागावे. जसा जसा काळ बदलतो तसे कदाचित या अपेक्षा वाढत आहेत असे सुद्धा आढळेल. ते बरोबर आहे का? काही अटी शिथील केल्या तर काय वाईटात वाई ट आणि चांगल्यात चांगले घडू शकते याचा विचार करावा. व्यक्तीची आवडनिवड, बाह्यस्वरूप , कौटुंबिक स्थिती हे सगळे बदलू शकते हे हे मनात पक्के असू द्यावे आणि त्यानुसार निर्णय घ्यावा.
मुलींना त्यांच्या किमान अपेक्षांना मुरड घालू नये. दोघांनीही स्पष्ट काय सांगायचे ते सांगावे आणि मान्य असेल तर लग्न करावे. केवळ मुलींनी अपेक्षांना मुरड घालून प्रश्न पूर्ण सुटणार नाही. मुलींच्या मनात अपेक्षा कशा वाढल्या त्याचे कारण सुद्धा शोधायला हवे.
ज्या मुलाच्या आईवडिलांना मुलीने मुरड घालावी असे वाटते त्यांचा मुलगा कसा वागतो आहे? त्याने तडजोड केली आहे का? लग्न होईल पण मुलामुली चा दोघांचाही लग्नाकडे बघण्यचा दृष्टीकोन निकोप नाही त्यामुळे संसार कुरबुरीचा राहिल असे वाटत नाही का?
मुलगा सिगरेट ओढतो, मुलगी दारू पिते, तिचा /त्याचा मित्रपरिवार आहे, तिला नोकरी नाही / त्याला कमी पगार आहे असे कोणतेही कारण न पटणारे असू शकते. हे सर्व इतके खाजगी आहे की दुसऱ्याने त्यात नाक खुपसू नये. त्यावर केव्हा आणि किती तडजोड करायची हा निर्णयही मुलामुलींचा आहे आईवडिलांचा नाही! फार तर फार आईवडिलांच्या हातात उरले आहे ते तटस्थतेने दोन्ही बाजू मुलांपुढे मांडणे...पण जी मुले एकदा स्वतंत्र विचार करू लागली आहेत त्यांना पालकांचे म्हणणे पटेल असे नाही. (पण दुर्दैवाने )त्यांना त्यांचे यशस्वी होण्याचे मीटर आपल्या संसाराला लावता येत नाही हे वास्तव आहे. मी एवढा / एवढी यशस्वी आहे म्हणून मी तडजोड करणार नाही असा त्यांचा युक्तीवाद असतो.
मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट करण्याचे सोंग फार काळ घेता येत नाही. घुसमट ,कुरबुर, वाद, आणि शेवटी घटस्फोट अशा पायऱ्या आजच्या मुली आणि मुले शुल्लक कारणावरून चढत जातात असे आधीच्या पिढीला ( ज्यांचे वय आता ५५च्य वर आहे त्यांना) वाटणे साहजिक आहे कारण त्यांच्या पिढीत चित्र वेगळे होते. अनेक मध्यमवर्गीय स्रिया स्वतःच्या पायावर उभ्या असूनही सासू सासऱ्यांबरोबर एका घरात राहणे, त्यांची बोलणी खाणे, पतीच्या इच्छेला प्राधान्य देणे अशी वागणूक ठेवत . त्यामुळे त्यांचे संसार सुरळीत झाले. पण आनंदी झाले नाहीत हे वास्तव आहे. ( काही खंबीर स्रिया आणि समजूतदार पुरुष यांचा संसार अपवाद असेल) असा संसार पाहून त्यापुढील पिढीने म्हणजे आजच्या मुलामुलींनी आपल्या डोक्यानूसार, स्वभावानुसार काही ग्रह करून घेतले आणि तसेच सहजीवन असावे अशी त्यांची अपेक्षा आहे त्यात काय चुकले?
बदलत्या काळानुसार ,वेगानुसार आणि च टकन दिसणाऱ्या तात्पुरत्या फायद्याचा विचार त्यांना करणे सोपे आहे आणि अनेकजण ते च करतात. म्हणून असा प्रश्न निर्माण होतो.
येणाऱ्या सुनेने आपली काळजी घ्यावी अशी अपेक्षा करणाऱ्या सासूसासऱ्यांकडे त्यांचा स्वतःचा मुलगा किती लक्ष देत असतो? हा प्रश्न ज्या मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गाला जाणवतो आहे त्यामध्ये आज मुलांचे घरातले वास्तव्य फक्त सहा - सात तासाचे असते ही वस्तुस्थिती आहे. मुलगी आहे म्हणून ती खूप वेगळे वागते असे नाही. आज प्रत्येकाच्या आयुष्यात दुसऱ्या व्यक्तीकरता वेळ आणि जागा आहे का ? हा कळी चा मुद्दा आहे. वेळ असला तरी तो द्यायचा आहे का? त्याऐवजी स्वतःकडे जास्त लक्ष देणे ही त्यांना गरज वाटते.
स्वतःचा संसार करतांना हे माझ आणि हे तुझ असा संसार आज मुलामुलींना करायचा असतो. त्यात 'आपले '/दोघांचे असे काय असते? त्याच्यासाठी / तिच्यासाठी तरी काही करायची मनाची तयारी असते का? वैवाहिक सौख्य हवे असते पण जबाबदाऱ्या नको असतात. लग्न करायचे असेल तर सर्व तडतोड स्वीकारून ते करावे लागेल हे मनात असू द्यावे. किती अनुरूप आहेत , किती देखणे आहेत अशा गुणवत्तेपेक्षा, आर्थिक वरचढ असण्यापेक्षा ज्याचे लवचिक असण्याचे पारडे जड आहे त्यांचा संसार यशस्वी होतो. हे सांगून कळेल असे तत्त्व नाही कळले तरी वळेल असे नाही. ही मर्यादा आहे.
मुले हुशार असतात, मुली सुंदर असल्या की झाले, तशा त्या मठ्ठ असतात हे गृहितच धरले जाते, मुलगा कर्तबगार असावा , मठ्ठ मुली / मुलगे लग्न करतात / मुलींच्या अपेक्षाच चूक अशी कोणतीही कितीही उदाहरणे स्वतःच्या समर्थनासाठी देता येतात. सगळी हुशार डोकी अशा वादविवादात उतरू शकतात... त्याने कुणाला मनासारखा जोडीदार मिळणार असेल आणि संसार सुखाचा होणार असेल तर या वादविवादाला काही अर्थ आहे.
अशा सर्व गुंतागुंतीमुळे तडजोड करता येत नसेल तर लग्न करू नये असे मला वाटते कारण दोन व्यक्तींना , दोन्हीकडच्या माणसांना , नंतर लहान मुलांना उगीच त्रास नकोच .
शिवाय मुलामुलींनी लग्न केले पाहिजे असे नाहीचः)