मुलगी/ मुलगा लग्नाला उभी राहिली की अचानक तिच्या अपेक्षांची लिस्ट सुरू होते असे नाही. मुले वाढत असतांना त्यांच्या मागण्या किती लवकर आणि किती प्रमाणात पालक पूर्ण करतात यावर त्यांची भौतिक सुखाकडे बघण्याची दृष्टी तयार होत असते. त्यांचा स्वभाव, नातेवाईक, संगत, अनुभव याने या सर्व गोष्टींकडे बघण्याच्या नजरेत भर पडते. लहानपणापासून गरज आणि चैन यातला फरक त्यांच्या नजरेला आणून देणे आवश्यक आहे असे मला वाटते. हे माझ्या पालकांनी सुरुवातीला केले होते आणि त्याचा नक्की उपयोग झाला. पण आताच्या काळात त्याने खूप परिणाम होईल असे नाही कदाचित थोडा फरक पडेल कारण प्रामुख्याने गेल्या दहा बारा वर्षात आर्थिक स्तरानुसार आणि स्वभावानुसार गरज आणि चैनीच्या वाख्ग्याच वेगळ्या झाल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे. आमच्याकरता ( ज्यांची मुले दोन तीन ते १० वर्षाची आहेत) हे आव्हान अधिकच अवघड आहे. तरीसुद्धा काही पालक नक्की प्रयत्नशील आहेत.
मुलामुलीना दोघांनाही घर, कपडे, वस्तू या गोष्टी स्वतःच्या बळावर घे. अन्यथा दुसऱ्याकडून त्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे हे पटणे महत्त्वाचे आहे. त्याची सुरुवात अचानक २२ व्या वर्षी होऊ शकत नाही.
ती लहानपणापासून होते. म्हणूनच एकीकडे स्वातंत्र्य आणि अधिकाराच्या गप्पा करणाऱ्या दोघांचाही स्वाभिमान आणि अक्कल दुसऱ्यावर अपेक्षाचे ओझे लादतांना कुठे जाते?
सध्या लग्न करायचे आहे पण अमूक अमूक मान्य असेल तरच असा जमाना आहे. तरीसुद्धा सासूसासऱ्यांबरोबर राहण्याऱ्या सुना आहेत, लग्नाकरता तडजोड करणाऱ्या मुली आहेत, बायकोच्याच म्हणण्यानुसार वागणारे पुरुष आहेत, लग्न झाले की मुलगा आणि मुलगी दोघांवरचा आपला हक्क संपला असे मानणारे समजूतदार पालक आहेत. पूर्वीपेक्षा लग्न जमणे अवघड झाले आहे खरे पण लग्न होतच नाहीत किंवा टिकतच नाहीत अशी स्थिती आलेली नाही. कदाचित ती सुद्धा येईल. लग्नाची गरजच उरणार नाही असेही होईल. मुलीला लग्नाकरता मुलगा हवा आहे/ मुलाला मुलगी याचा सुद्धा आनंद काही काळाने पालकांना होईल सांगता येत नाही. एवढी हीच एक अपेक्षा सुद्धा पूर्ण करणे कठीण वाटेलः)

कल्पना दारिद्द्य वगैरे काही नाही. हा बदलेला काळ आहे. ही पिढी तिची ठराविक मते घेऊन उभी आहे. पण ही मते कशी , कशामुळे तयार झाली याचा विचार कराल तर त्याची किमान ४०% जबाबदारी पालकांकडे म्हणजे आज ५५+ असणाऱ्या व्यक्तींवर जाते असे वाटत नाही? हा जमाना वरवर स्त्री नोकरी करते आहे स्वतःच्या पायावर उभी आहे असे दिसत असले तरी बहुतांशी घरात पुरुषांचे वर्चस्व/ धाक असण्याचा होता. त्याने बायकोचे बिलकूलच ऐकले नाही वा सगळेच ऐकले अशा घरात प्रश्नांची संख्या वाढली आहे असे माझे निरीक्षण आहे.
त्यातून लग्न आणि सहजीवन याचा विचार करून योग्य निर्णय घेणारी पिढी पुढे येणे केवळ सुदैव आहे. याउलट जिथे संवाद होता निकोप वातावरण होते, जबाबदाऱ्या आणि अधिकाराचे योग्य व्यवस्थापन होते त्या घरात असे जास्त प्रमाणात दिसत नाही.
समाज काही एकदम तयार होत नाही, पालक आणि त्यांची मुले हे मुख्य घटक असतात, तीच मुले मोठी कशी होतात , ते संस्कार, वातावरण यातून पुढचा समाज होतो. पाश्चात्यांचे अनुकरण हा मुद्दा काय एकदम याच पिढीत उपस्थित झाला का ? आधीच्या पिढीतही नक्की होता. आता अनुकरणाचा वेग वाढला आहे एवढाच काय तो फरक.. आणि अनुकरण करतांना सगळे वाईटच का घेता येते? पाश्चत्यांमध्ये काही चांगल नाही असे नाही आणि जे चांगल आहे ते घ्यायला नेहमी अवघड असत हे वास्तव आहे.
लग्न होणे (अथवा नंतर सुरळीत संसार होणे) हा नशिबाचा भाग आहे हे मी मानते. पण केव्हा ?जेव्हा एखादी व्यक्ती अपेक्षांबाबत लवचिकता दाखवते , किमान अपेक्षावर उतरूनही लग्न होत नाही / सर्व तडजोडी करून संसार टिकत नाही तेव्हा नशिबाकडे बोट दाखवावे.
असो .