आजही वर्तमानपत्रात ''वधू पाहिजे'' जाहिरातीत ''गोरी, सुंदर, मनमिळाऊ, स्मार्ट व गृहकृत्यदक्ष'' मुलगीच बायको म्हणून हवी असते! मला सांगा, अशा मुली काय झाडाला लागतात का?

याचा नेमका अर्थ काय घ्यावा? "झाडाला लागणाऱ्या मुली या गोऱ्या, सुंदर, मनमिळाऊ, स्मार्ट आणि/किंवा गृहकृत्यदक्ष नसतात" असे काही यातून सुचवायचे आहे काय?

मुळात (कोणत्याही प्रकारच्या) मुली झाडाला लागतात याचीच कल्पना नव्हती. (असती तर अगोदर झाडेच शोधली असती.) पुढच्या वेळी झाड दिसले की नीट निरखून पाहीन. (घरासमोरच दोन आहेत. घरामागे थोडे अंतर सोडून तर अनेक आहेत. झाडे. मुली नव्हेत.)

होतकरूंनी या बाबीची नोंद घ्यावी.

आजही समाजात वर्णाने काळ्या, जाड्या, बुटक्या, नोकरी नसलेल्या, पत्रिकेत मंगळ असलेल्या, चश्मिस्ट मुलींना लग्नासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांना मुलांकडून चटचट होकार येत नाहीत. शेवटी होकार आलेले स्थळ किंचित डावे असले तरी नाईलाजाने [लग्न होणे आवश्यक वाटत असल्यास] तडजोड करावी लागते.

सदर वर्णनाच्या* मुलांची परिस्थिती याहून फार वेगळी किंवा अधिक सुखकर असते असे वाटत नाही.

(*तेवढा मंगळाचा आणि कदाचित चष्म्याचा घटक वगळल्यास. या दोन घटकांच्या बाबतीत कदाचित थोडी विषमता असूही शकेल.)

ह्यात आपण व्यंगयुक्त, वांशिक आजार असलेल्या, गतिमंद मुलींचा तर विचारच केलेला नाही. त्यांनी तर तडजोडच करावी हे उघड मानण्यात येते.

अशाच वर्णनाच्या मुलांना लग्नाच्या बाजारात काही विशेष सवलत मिळत असावी असे वाटत नाही.

बाकी चमत्कारिक किंवा अतिरेकी अपेक्षा या मुलांच्या किंवा वरपक्षाच्याही बाजूने असू शकतात** हा आपला मुद्दा पटण्यासारखा आहे. कदाचित या मुद्द्याच्या बाबतीत तेवढी विषमता नाही असेही म्हणता येईल. मग चर्चा मात्र मुलींच्याच अपेक्षांची का होते हाही प्रश्न रास्त आहे. याबाबत एक लक्षात घ्यावे लागेल, की मुलांच्या किंवा वरपक्षाच्या अतिरेकी अपेक्षा ही आता फारच शिळी बातमी झाली असावी. त्यावर बहुधा पूर्वापार अनेक लेख आणि चित्रपटही होऊन गेले असावेत. त्यामुळे त्याची चर्चा करण्यात कोणाला फारसा रस राहिला नसावा. (याचा अर्थ आज मुलांच्या अपेक्षा चमत्कारिक किंवा अतिरेकी असू शकत नाहीत असा होऊ नये. पण 'रोज मरे, त्याला कोण रडे'?) मुलींच्या चमत्कारिक किंवा अतिरेकी अपेक्षा ही तुलनेने नवी गोष्ट असावी. म्हणजे पूर्वी मुलींना अपेक्षा (रास्त किंवा अतिरेकी) नसाव्यात असे नाही, परंतु सामाजिक दबावाखाली त्या दबल्या जात असाव्यात, त्याउलट आजकाल तशी दबावाची परिस्थिती (कोणत्याही कारणाने) बरीच कमी झाली असावी, त्यामुळे अपेक्षांबरोबरच अतिरेकी प्रवृत्तीही क्वचित्प्रसंगी उफाळून येत असाव्यात. अर्थात ही सामान्य परिस्थिती नसावी, अतिरेकी प्रवृत्तीच्या घटना या प्रमाणाने वाढल्या तरीही एकंदरीत अपवादात्मकच असाव्यात, परंतु तरीही अशा घटनाच तेवढ्या सहज डोळ्यांत भरत असल्यामुळे त्या अपवादात्मक नसून नियम बनू पाहत आहेत अशी काहीशी सामान्य जनधारणा होत असावी. आणि त्यामुळे एकंदरीत मुली(च तेवढ्या) टीकेचे लक्ष्य बनत असाव्यात. (हे योग्य आहे असा दावा नाही.)

हेही दिवस जातील. जसजसे या प्रकाराचे (दबावरहित स्वातंत्र्याचे, कदाचित भारतीय परिस्थितीत अचानक काही जणांच्या हातात खेळू लागलेल्या आर्थिक शक्तीचे आणि अशा अतिरेकी घटनांचेसुद्धा) नावीन्य ओसरेल, अप्रूप वाटेनासे होईल, तसतशी टीकाही ओसरेल आणि कदाचित अतिरेकी प्रकारांचे प्रमाणही स्थिरावेल. कदाचित दोन्ही बाजूंनी. निदान अशी आशा करायला तरी हरकत नसावी.

**''गोऱ्या, सुंदर, मनमिळाऊ, स्मार्ट व गृहकृत्यदक्ष'' वधूच्या जाहिरातीतील अपेक्षांमधील "गोरी, सुंदर आणि गृहकृत्यदक्ष" या अपेक्षांबद्दलचा आक्षेप समजू शकतो. बाकी "भांडखोर आणि बावळट वधू पाहिजे" अशी जाहिरात नजीकच्या भविष्यकाळात वर्तमानपत्रांतून झळकण्याची अपेक्षा निदान मी तरी करत नाही.

बाकी अपेक्षांना मुरड किंवा तडजोड वगैरे प्रकार हे एकाच बाजूने करावेत असा सल्ला मला तरी अयोग्य वाटतो. एक तर अतिरेकी अपेक्षा ही एकाच बाजूची मक्तेदारी नसावी. त्यात लग्न ठरवताना अपेक्षांना मुरड किंवा तडजोड वगैरे प्रकार, अपेक्षा जोपर्यंत वाजवी आहेत तोपर्यंत, कोणत्याच बाजूने करण्याचे काहीच कारण दिसत नाही. लग्न करून कोणीही कोणावरही उपकार करत नसते, तेव्हा एखाद्या स्थळाकडून आपल्या अपेक्षा पूर्ण होऊ शकणार नाहीत असे वाटल्यास (आणि दुसऱ्या एखाद्या स्थळाकडून त्या पुऱ्या होऊ शकतील, किंवा त्या पुऱ्या होऊ शकतील असे दुसरे एखादे स्थळ मिळू शकेल, असे वाटत असल्यास), अशा स्थळास नकार देऊन शोध जारी ठेवण्यात काहीही गैर नसावे, आणि अपेक्षांना मुरड घालण्याची किंवा तडजोड करण्याचीही काहीच गरज नसावी. अपेक्षा वाजवी असाव्यात ही अपेक्षा वाजवी आहे, परंतु 'वाजवी अपेक्षा' म्हणजे 'अपेक्षा पूर्ण करू शकेल आणि त्यातूनही अपेक्षा करणाऱ्या व्यक्तीकरिता ती पूर्ण करण्याची इच्छा बाळगू शकेल, अशी इतर सर्व बाबतीत अनुरूप व्यक्ती अस्तित्वात असण्याची आणि सहजासहजी मिळण्याची अपेक्षा जिच्यापासून करता यावी, अशी अपेक्षा' (हुश्श!), हेही लक्षात ठेवणे इष्ट आहे. आपल्या सर्व अपेक्षा वाजवी मानणारी आणि पूर्ण करण्याची तयारी असणारी (किंवा किमानपक्षी त्यास हरकत नसणारी) व्यक्ती आपणास मिळू शकेल (आणि अशा व्यक्तीच्या आपणाकडून असू शकणाऱ्या सर्व अपेक्षा आपणही पूर्ण करू शकू, आणि तशा त्या करण्याची आपल्याला इच्छा असेल) असा आत्मविश्वास असेल, तर खुशाल आपल्या अपेक्षा वाजवी मानाव्यात. दुसऱ्या बाजूस त्या अवाजवी वाटल्यास दुसऱ्या बाजूस नकाराची मोकळीक आहेच. आणि दुसऱ्या बाजूच्या - येऊ घातलेल्या कोणत्याही दुसऱ्या बाजूच्या - अपेक्षा आपल्याला अवाजवी वाटल्यास आपल्यालाही नकाराची मोकळीक असतेच. अशा अनेक प्रयत्नांतून काही न जमल्यास आपल्या अपेक्षा पुन्हापुन्हा तपासून पाहणे इष्ट ठरावे, परंतु याचा अर्थ त्या नक्की अवाजवी आहेतच असाही होऊ नये. आणि सरतेशेवटी दुसऱ्याच्या अपेक्षा अवाजवी असल्यास त्याला नकार देण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही; आपल्या अपेक्षा अवाजवी असल्यास मात्र आपल्याला सदैव नकार मिळून आपलेच लग्न होत नाही, हेही (कोणत्याही बाजूने) लक्षात ठेवावे. लग्न न होण्याने फरक पडत नसेल, तर कसलीच चिंता करू नये. मग सर्वच वाजवी!

शेवटी आपल्या काय अपेक्षा आहेत (आणि त्या पूर्ण करणाची तयारी असणारे कोणी मिळू शकते का) आणि दुसऱ्याच्या आपल्याकडून काय अपेक्षा असू शकतात (आणि त्या पूर्ण करण्याची आपली तयारी आहे का) यांच्या समतोलाचा हा प्रश्न आहे. समतोल साधू शकला, तर सर्वच वाजवी. समतोल साधला नाही पण त्याची पर्वाही नाही, तरीही सर्वच वाजवी. समतोल साधला नाही पण त्याची पर्वा आहे, तर मात्र वाजवीपणा पुन्हा तपासून पाहण्याची गरज आहे. (याचा अर्थ या परिस्थितीत अपेक्षा नेहमी वाजवी नसतीलच असा नाही. मात्र त्या वाजवी असल्यास अशा परिस्थितीत पर्वा न करणे याव्यतिरिक्त फारसा पर्याय आपल्या हाती राहत नाही, हेही तितकेच खरे.)

थोडक्यात, 'इफ़ यू कॅन गेट अवे विथ इट, इट इज़ फ़ेअर. इफ़ यू कॅनॉट गेट अवे विथ इट बट इफ़ यू डोंट केअर, इट इज़ स्टिल फ़ेअर. इफ़ यू कॅनॉट गेट अवे विथ इट अँड इफ़ यू डू केअर, यू हॅव अ प्रॉब्लेम. (बेटर नॉट केअर.)' - टग्याचे तत्त्व. (प्रताधिकार २०१०.)