भावी नवऱ्याचे आईवडील त्याच्याबरोबर राहणार ही गोष्ट त्याना फारशी पसंत नसते.
किती टक्के मुलांना मुलीचे आईवडील आपल्या घरी कायमचे राहिलेले आवडतील?
कायमचे सोडा, तात्पुरत्या भेटीसाठी रहावयास जरी आले तरी काही काळानंतर, संबंध कितीही चांगले असले तरी, तो सासुरवास वाटू शकतो हे मी वैयक्तिक अनुभवावरून सांगतो. मग मुलींना तरी आयुष्यभराचा सासुरवास का पसंत असावा?
मला वाटते लग्नानंतर नवीन जोडप्याने शक्य तोवर दोघांच्याही आईवडिलांपासून स्वतंत्र (संबंध तोडून नव्हे. वेगळ्या घरात.) राहण्याची संस्कृती रुजल्यास उत्तम.
पुण्यातील मुलीस पुण्यातलाच मुलगा हवा असतो.
या अपेक्षेत अवाजवी असे काही आहे असे मला तरी वाटत नाही. (ते तितकेसे खरेही नाही. पण ज्या प्रमाणात खरे आहे, त्या प्रमाणात त्यात काही गैर नसावे. इतर ठिकाणच्या मुलींपेक्षा फारसा वेगळा सामान्य कल पुण्याच्या मुलींमध्ये असावा असे वाटत नाही. चूभूद्याघ्या. )
पण हल्ली मुलींना नवरा आपल्यापेक्षा अधिक शिकलेला, अधिक पगार मिळवणारा̮ ,लग्नापूर्वीच स्वतःचा फ्लॅट असणारा शिवाय घरात सर्व सुखसोयीची साधने ( म्ह. टी. व्ही., फ्रीझ , इ. ) उपलब्ध असणारा असा हवा असतो.
अधोरेखित अपेक्षा या अवास्तव किंवा अवाजवी वाटणे हे समजण्यासारखे आहे. अनेकदा अनेक (पण सर्वच नव्हे) मुलांना पूर्णपणे स्वतःच्या हिकमतीवर स्वतःच्या पायांवर उभे राहून बस्तान बसवावे लागत असावे. अनेकदा शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घरापासून दूर स्वतंत्रपणे राहावेही लागत असावे आणि जसजसे जमेल तसे हळूहळू घर, चीजवस्तू वगैरे संचय करत जावा लागत असावा. यात आईवडिलांकडून काही अंशी आर्थिक हातभार लागण्याची शक्यता असली तरी (विशेषतः नोकरीस लागल्यावर) अनेकदा पूर्णपणे अशा हातभारावर अवलंबून राहण्याची इच्छा नसू शकावी, स्वबळावर बस्तान बसवण्याची, 'काहीतरी करून दाखवण्याची' उर्मी असू शकावी. यात नाही म्हटले तरी काही वर्षे जाऊ शकावीत आणि अनायासे आयुष्यात काही टक्केटोणपेही खाल्ले जाऊ शकावेत. या सर्व चीजवस्तू आयत्या मिळत नाहीत, त्यांकरिता कष्ट करावे लागतात याची अक्कल आलेली असावी, त्यातून अनेकदा त्या आयत्या मिळाल्या तरी नकोशा वाटू शकाव्यात. टक्केटोणपे खाल्ल्याने थोडी प्रगल्भता येत असावी.
अर्थात या सर्व दिव्यातून जाणाऱ्या, नव्हे जाऊ इच्छिणाऱ्या, स्वतःच्या पायावर पूर्णपणे उभ्या राहणाऱ्या, काही वर्षे नोकरी करून नुसत्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्रच नव्हे, तर टक्केटोणपे खाऊन शहाण्या झालेल्या, क्वचित्प्रसंगी नोकरीनिमित्त स्वतंत्रपणे राहिलेल्यासुद्धा मुलीही असू शकतात, नव्हे अनेक असतात. अशा मुलींकडून, जगाचा थोडा अनुभव असल्यामुळे, चैनीच्याच नव्हे तर गरजेच्यासुद्धा चीजवस्तू जमवण्यासाठी, बस्तान बसवण्यासाठी कायकाय करावे लागते याची थोडीफार कल्पनाच नव्हे, तर अनुभवही असल्यामुळे, एकंदर प्रगल्भता आलेली असल्यामुळे, अवाजवी अपेक्षा असण्याची शक्यता त्या मानाने बरीच कमी असावी .
पण बाकीच्या मुलींचे काय? आपल्याकडे लग्नाचे वेळी मुलींचे वय सामान्यतः किती असते?
बाविसाव्या किंवा तेविसाव्या वर्षी माणसाला (मुलांना काय किंवा मुलींना काय) कितीशी अक्कल आलेली असते? (मला नव्हती! म्हणजे आज चव्वेचाळिसाव्या वर्षीसुद्धा खूप आलेली आहे, असा दावा नाही. पण तेविसाव्या वर्षी तर नव्हतीच नव्हती.) जगाचा कितीसा अनुभव असतो? अगदी एकदोन वर्षे नोकरी केलेली असली तरी धक्के कितीसे खावे लागलेले असतात? मुलींच्या बाबतीत बोलायचे तर या वयात किती जणी खऱ्या अर्थी पूर्णपणे स्वतःच्या पायांवर उभ्या असतात, खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतात? (आईवडिलांपासून दूर राहण्याची गोष्ट तूर्तास विसरून जाऊ. ते आवश्यक आहेच, अशातलाही भाग नाही.) त्यात 'या घरच्या लाडक्या लेकी'च्या आईवडिलांच्या घरी या चीजवस्तू असतील तर मग तर तशी अपेक्षा बनण्याची, तुलना होण्याची शक्यता वाढत असावी. मग भले त्या चीजवस्तू तिच्या स्वतःच्या कमाईच्या नसोत, आईवडिलांच्या कमाईच्या असोत. (स्वकमाईच्या असल्यास समजण्यासारखे आहे.) कदाचित अपेक्षा बनवण्यात काही अंशी आईवडिलांचाही अप्रत्यक्ष हातभार लागत असण्याची शक्यता नाकारता येऊ नये.
अनुभवातून आलेल्या शहाणपणाअभावी, जगात आपली नेमकी पत काय आहे याची नीट जाणीव झालेली नसताना, अपेक्षा या केवळ स्वत:बद्दलच्या कल्पनांखेरीज इतर कशातून निर्माण व्हायला फारसा वाव नसावा. अशा परिस्थितीत स्वतःबद्दलच्या कल्पना या वास्तव असतील किंवा नाही हे बहुतांशी आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून राहावे. हे अर्थातच मुलांना आणि मुलींना सारखेच लागू व्हावे, आणि मुलांकडून अवाजवी अपेक्षा ऐकायला मिळाल्यास त्यामागेही बहुधा हेच कारण असावे. मात्र, मुलांच्या बाबतीत लग्नापूर्वी जगाचा अनुभव घेऊन आपली पत जाणण्याकरिता थोडासा अधिक वेळ मिळतो हीसुद्धा एक बाब आहेच. हा अधिकचा वेळसुद्धा सर्वच मुलांना शहाणपण येण्याकरिता पुरेसा असतोच, असे नाही, परंतु अनेकदा मुलींना तेवढाही वेळ उपलब्ध होत नाही, होऊ दिला जात नाही, हा कळीचा मुद्दा आहे.
अर्थात, या वयोगटातल्या सर्वच मुलींच्या - किंवा मुलांच्यासुद्धा - अपेक्षा
या अवाजवी असतात असे म्हणण्याचा मुळीच उद्देश नाही. किंबहुना
बहुतांशांच्या नसाव्यात असेही म्हणण्याचे धाडस करू इच्छितो. आणि ज्यांच्या
असाव्यात त्यांच्यामुळे बाकीचा गटही बदनाम होत असण्याची शक्यताही नाकारता
येत नाही. परंतु जेथे असे होते त्याला स्वतःबद्दलच्या अवास्तव कल्पना आणि
त्याला खतपाणी देणारे आजूबाजूचे वातावरण यांचा खूप मोठा हातभार असावा, असे
वाटते.
आपल्या समाजात मुलाच्या काय किंवा मुलीच्या काय, पालकांकडून जोपर्यंत आपल्या मुलाचे किंवा मुलीचे एकदा लग्न लावून दिले, की आपली जबाबदारी संपली, आयुष्याची इतिकर्तव्यता झाली, आणि जितक्या लवकर ते होईल तितके बरे, ही भावना नष्ट होत नाही, तोपर्यंत या समस्येला उत्तर नाही. एक ठराविक वय झाले, की मुलावर किंवा मुलीवर घरातून लग्नासाठी दबाव येऊ लागतो. आपल्याला काय करायचे आहे, आपण लग्नासाठी तयार आहोत का, आपल्या अपेक्षा काय आहेत याबद्दल मोकळा विचार करणे मग कठीण होऊ लागते. लग्न हा मुलाचा किंवा मुलीचा प्रश्न न राहता आईवडिलांचा प्रश्न बनतो. मुलांना किंवा मुलींना पूर्णपणे आपल्या पायावर उभे राहू देऊन, पूर्णपणे स्वतंत्र होऊ देऊन मग त्यांना योग्य वाटेल तेव्हा, त्यांच्या स्वतःच्या पुढाकाराने आणि घरून कोणताही दबाव न आणता, आपण लग्नास खरोखरच तयार आहोत की नाही की केवळ जनरीत म्हणून एका ठराविक वयात विवाह करू पाहतोय याचा पूर्ण विचार करून लग्न करू देण्याची पद्धत समाजात जेव्हा सामान्य होईल, तेव्हा हे प्रश्न आपोआपच नाहीसे होतील. आणि नाही झाले यातून कोणाचे लग्न (किंवा नाही केले यातून कोणी लग्न), तर तो त्या मुलाचा किंवा त्या मुलीचा प्रश्न असेल, त्याच्या आईवडिलांचा नव्हे.
लग्न ही वैयक्तिक निवड आहे, पालकांची जबाबदारी नव्हे, अशी संस्कृती जेव्हा समाजात रुजेल तो सुदिन.