श्री. प्रसाद गोडबोले यांच्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आधी.  पुरुषार्थ बरोबर, लेखनातली त्रुटी दाखवून दिल्याबद्दल आभारी.
पहिल्या प्रश्नाचे उत्तर : कुणाचाही प्रतिसाद यायच्या अगोदर जुने लेखन दुरुस्त करता येते, किंवा काढून टाकता येते. त्यानंतरमात्र प्रशासकांच्या मदतीनेच या गोष्टी करता येतात.
दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर : लिहिताना शक्यतो फक्त व्याकरणशुद्ध आणि प्रमाण मराठीच वापरावी. बोलीभाषा ही फक्त बोलताना. पण तिलासुद्धा व्याकरणाचे नियम असतात, हे विसरू नये.
आणखी माहितीः
कलकत्त्यातल्या एका विशिष्ट भागातल्या भद्र लोकांच्या बोलण्याची भाषाच शुद्ध बंगाली समजली जाते.  
पूर्वी तटबंदी असलेल्या अहमदाबादच्या एका विभागात राहणाऱ्या नागर ब्राह्मणांचीच भाषा प्रमाण गुजराथी समजली जाते.
लंडन शहराच्या दक्षिणेकडील शिक्षणसंस्था असलेल्या एका लहानशा क्षेत्रात जशी इंग्रजी बोलली जाते, त्या उच्चारांनाच  प्रमाण इंग्रजी म्हटले जाते. अजूनही अशुद्ध इंग्रजीत कुणा प्रसिद्ध लेखकाने लिखाण केल्याचे आढळलेले नाही. इंग्रजीचा प्रसार शुद्ध इंग्रजीनेच केला, अशुद्धने नाही!
मराठी सोडून इतर सर्व भारतीय भाषांच्या संकेतस्थळांवर त्या त्या भाषेतले नियम पाळूनच लिखाण केलेले सापडते. महाराष्ट्र एकमेव अपवाद, कारण महाराष्ट्रातले सरकारी शिक्षणखाते भाषाशिक्षणाला काडीचीही किंमत देत नाही.  मराठीची लाखो क्रमिक पुस्तके शुद्धलेखनांच्या चुकांमुळे छापून विक्री केल्यावर परत मागवून नष्ट करावी लागतात, हे कशाचे लक्षण आहे?
आणि शेवटचे : पुण्यातल्या सदाशिव पेठेत राहणारे ब्राह्मण जशी मराठी बोलत तिलाच प्रमाण मराठी समजण्याची पद्धत आत्ताआत्तापर्यंत होती, जे शब्दकोश आणि जी व्याकरणाची पुस्तके रचली जातात, ती याच मराठीला प्रमाण धरून. 
सीतायाः पतये लिहिणारा बुधकौशिक ऋषी.  सीतापतये असे लिहिणे शुद्ध , परंतु सीतायाः नंतर मात्र पत्येच हवे, हे खरे. छंदाच्या सोईसाठी पत्ये ऐवजी पतये लिहिणे ही फार मोठी चूक नव्हे. हे आर्षरूप समजून सोडून द्यावे. बुधकौशिक ऋषी पाणिनीच्या आधीचा असावा.  अशांना पाणिनीचे नियम लागू पडत नाहीत.