अशी अनेक उदाहरणे देता येतील. २. ३७ हा श्लोक प्राप्त परिस्थितीत पार्थाला स्वधर्म निभावण्यास उद्युक्त करणारा काहीसा व्यवहारी, यथार्थवादी श्लोक आहे. २. ४७ हा कर्मयोगविषयक तत्त्वविचार आहे.
गीता हे एकाच मार्गाचे (ज्ञान/ भक्ती/ कर्म/ योग/ उपासना इ. ), निष्ठेचे (सांख्य/ योग) विवेचन नाही. सरळ रेषेत विचार करणर्या तर्कबुद्धीला बुचकळ्यात पाडणारे आणि विरोधाभासी वाटणारे श्लोक गीतेत असणे तसे स्वाभाविक आहे. अर्जुनालाही असे प्रश्न पडले उदा. सगुण भक्ती/ निर्गुणोपासना यात श्रेयस्कर काय? (१२ - १), स्थितप्रज्ञाचे कौतुक करतोस आणि मला या घोर कर्मात का ढकलतोस (३-१)?. अशा प्रश्नांची सविस्तर उत्तरे आणि त्या अनुषंगाने केलेला साधक बाधक विचारही गीतेतच आहे.
प्रत्येक व्यक्तीची स्थिती, गती आणि त्या व्यक्तीला ओघानेच येणारी स्थळ, काल, परिस्थितीची बंधने हा संदर्भ लक्षात घेऊन तिला उपयुक्त असे मार्गदर्शन या ग्रंथाधारे करता येते. (उदा. भक्तियोगाच्या १२ व्या अध्यायात अनन्य भावाने केलेली अमला भक्ती ते रोज ठराविक वेळ मनोभावे केलेली उपासना, प्रार्थना यांचा समावेश आहे. ) तेच समष्टी (समाज, राष्ट्र, विश्व) बाबतही खरे आहे. या संदर्भातही गीता मोलाची मार्गदर्शक तत्वे देते. उदा. ज्ञानी व्यक्तीने आपल्या सगळ्या कामना नष्ट झालेल्या असल्या, तरी लोकसंग्रहार्थ कर्म करावे. सामान्य जनांसमोर आदर्श उभा करावा असा स्पष्ट आदेश गीतेत आहे. या सर्वसमावेशकतेमुळेच गीता कित्येक विश्ववंद्य विभूतीना मातृस्वरूप वाटते.