प्रत्येक प्रसंगात संदर्भ वेगवेगळा असायचाच थोडाफार. गीतेचे हेच वैशिष्ट्य सांगतात की ती आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काय करावे याचे मार्गदर्शन करते. उद्या जर कसाब म्हणाला की मी गीता वाचली. त्यात हेच लिहिले आहे की स्वधर्माचे पालन करण्यात कसूर करू नये. आमच्या संघटनेने भारताविरुद्ध धर्मयुद्ध पुकारलेले आहे. आणि म्हणूनच मी अमुक इतक्या लोकांना यमसदनी धाडून माझे कार्य केले. आता मला नक्कीच स्वर्गात जागा मिळणार! तर काय चूक?

श्रीहरीचे शब्द बरोबर आणि दहशतवाद्यांचे चूक हे कसे काय हे तुम्ही अनमान करता सोदाहरण समजावून सांगितलेत तर बरे वाटेल. प्रत्येक धर्मात - धर्माविरुद्ध असणाऱ्यांना नष्ट करण्यासाठी सूचना, संकेत, पळवाटा ठेवलेल्या आहेत. हिंदू संस्कृती (धर्म म्हणवत नाही, पण तुम्हाला आवडत असेल तर तो शब्द घ्या) सर्वसमावेशक, सहिष्णू वगैरे समजली जाते. (निदान आपल्याला तरी तसे वाटत असते) त्यात हे गीतेचे वचन, किंबहुना युद्धाला तयार हो असे सांगणारी गीताच कशी बसवायची?

तीनचार वर्षांपूर्वी दोन मुस्लिम आणि एक ख्रिश्चन अश्या तीन मैत्रिणींशी गप्पा मारताना कुराण, बायबल वगैरे विषय निघाले. त्यात त्यांच्या धर्मपुस्तकात  जगण्याचे सगळे नियम वगैरे दिलेले आहेत तसे हिंदू धर्माचे कोणते पुस्तक असे त्यांनी विचारले. त्यावर आमच्याकडे असे पुस्तकात  बघून जगत नाहीत. मनुष्याने 'मनुष्यधर्माचे' पालन करावे. माणुसकी हाच धर्म वगैरे तारे मी तोडले. एका हुषार मैत्रिणीने गीतेविषयी विचारले. त्यावरही मी ते तत्त्वज्ञान आहे. सगळे लोक  काही गीता वाचून जगत नाहीत वगैरे सांगितले. आणि कारण नसताना गीतेचे मूळ म्हणजे महाभारत, अर्जुन वगैरेही सांगितले. तेव्हा 'चला युद्ध करा' असे सांगणारे (प्रो-वॉर) पुस्तक आपला महत्त्वाचा धर्मग्रंथ आणि तत्त्वज्ञान आहे हे ऐकून त्या तिघी दिग्मूढ झाल्या होत्या. आणि तेव्हा प्रथमच गीता आणि दहशतवादी यांचा संबंध लक्षात आला. सुदैवाने त्यानंतर कोणी असे पेचात टाकणारे प्रश्न विचारले नाहीत. तुम्ही समजावून सांगितलेत तर मला कोणी गीतेविषयी विचारले तर काय सांगायचे ही काळजी राहणार नाही.