विसुनाना

आपण म्हणता ते योग्यच आहे. भगवद्गीतेत अनेक ठिकाणी अशी विसंगती दिसते. या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी कश्या प्रकारे भाष्य केले आहे ते बघा.

मग ते वेळी हिये फुटावे । आता लाठेपणे का न झुंजावे ।
हे जिंतिले तरी भोगावे । पृथीतल ॥ २१९ ॥

ना तरी रणी एथ । झुंजता वेचले जीवित ।
तरी स्वर्गसुख अनकळित । पावसील ॥ २२० ॥

असे दोन ओव्यात श्लोकाचे भाषांतर देतात. पुढे भाष्य करताना काय म्हणतात बघा.

म्हणोनी ये गोठी । विचारू न करी किरीटी ।
आता धनुष्य घेऊनी उठी । झुंजे वेगी ॥ २२१ ॥

म्हणून या गोष्टींचा विचारही न करता धनुष्य घेऊन ऊठ आणि झटकन युद्धाला लाग.

देखे स्वधर्मू हा आचरता । दोषू नासे असता ।
तुज भ्रांती हे कवण चित्ता । एथ पातकाची ॥ २२२ ॥

स्वधर्म आचरताना असलेले दोष नाश पावतात. असे असताना पापाची चिंता तू कशाला करतोस?

सांगे प्लवेचि काय बुडिजे । का मार्गी जाता आडळिजे ।
परी विपाये चालो नेणिजे । तरी तेही घडे ॥ २२३ ॥

नावेने जाताना कोणी बुडेल नाय? किंवा चांगल्या मार्गाने जाताना अडखळेल काय? पण नीट चालता येत नसेल तर कदाचित तेही घडेल.

अमृते तरीचि मरिजे । जरी विखेसी सेविजे ।
तैसा स्वधर्मे दोषु पाविजे । हेतुकपणे ॥ २२४ ॥

दुधाने तेव्हाच रोगी मरतो जेव्हा तो ते विषाबरोबर घेतो. तसा स्वधर्माला दोष लागतो फलाशेने.

म्हणोनी तुज पार्था । हेतू संडोनी सर्वथा ।
क्षात्रवृत्ती झुंजता । पाप नाही ॥ २२५ ॥

म्हणून फलाशा (हेतू) सोडून क्षात्रधर्माने झुंजताना पाप नाही.

अश्या रीतीने ज्ञानेश्वरांनी " मेल्यास स्वर्गास जाशील आणि जिंकल्यास पृथ्वी भोगशील" हा युक्तिवादच फोल ठरवला आहे. किंबहुना अश्या फलाच्या आशेने युद्ध केल्यास ते (स्व)धर्माविरुद्ध असेल म्हणून "ती फलाशा सोडून निष्काम कर्मयोग म्हणून युद्ध कर" असा काहीसा श्रीकृष्णाच्या मूळ सांगण्याच्या विरुद्ध पण निष्काम कर्मयोगाशी सुसंगत असा अर्थ ज्ञानेश्वरांनी लावला आहे.

योग्य शंका उपस्थित करून बऱ्याच दिवसांनी ज्ञानेश्वरी उघडून वाचायला भाग पाडल्याबद्दल विसुनानांना धन्यवाद.

भगवद्गीता मला अतिशय विस्कळीत आणि विसंगतींनी भरलेला ग्रंथ वाटतो. मात्र ज्ञानेश्वरांनी अश्या बहुतेक सर्व विसंगती किंवा आपल्या मनात उद्भवणाऱ्या  शंका उपस्थित करून त्यांचे बुद्धीला पटणारे निरसन केले असल्याने (कधी कधी गीतेच्या विरुद्ध असले तरी) ज्ञानेश्वरीचे मोल गीतेपेक्षा जास्त वाटते.

विनायक