१) इथे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं खरं तर लेखकानी द्यायला हवीत पण ती न दिली गेल्यानं मी लिहीतो आहे
२) सर्व अध्यात्माचा उद्देश आपण मूळात कोण आहोत हे समजणं आहे. एकदा तुम्हाला आपण शरीर किंवा मनापासून वेगळे आहोत हे कळलं की सगळे प्रश्न तुमच्या पुरते तरी निश्चित सुटतात. जगण्याची मजा यायला लागते. तुम्ही निश्चिंत होता कारण कोणताही प्रसंग तुमच्यावर काहीही परिणाम करू शकत नाही, तुम्ही अनंदी होता कारण आनंद हा स्वरूपाचा स्वभाव आहे, तुम्ही उत्साही होता कारण तुम्हाला शारिरीक किंवा मानसिक स्थिती निरूत्साही करू शकत नाही. अध्यात्म इतकं सहज आहे.
३) आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला आपण निराकार आहोत (किंवा शरीर आणि मनापासून वेगळे आहोत) हे कळतं त्याला सगळ्यांचं स्वरूपही निराकारच आहे हे कळतं कारण निराकार हे तुमचं किंवा माझं स्वरूप नसून ते साऱ्या अस्तित्वाचं स्वरूप आहे. थोडक्यात ज्यात सगळे आकार आणि विचार प्रकट होतात ती अथांग पोकळी हे आपल्या सगळ्यांच मूळ स्वरूप आहे. त्याला आत्मा, सत्य, निराकार, अविनाशी, अमृत, अव्यक्त, शून्य, शांत, निर्लेप, अद्वैत, नित्य, अकर्ता अशी अनेक नांव आहेत. मी गीतेचा संपूर्ण अभ्यास केला आहे, मला एकाही श्लोकात कृष्ण अर्जुनाला तू आत्मा आहेस, अविनाशी आहेस असं म्हणताना दिसला नाही. गीतेची सगळी मांडणी आत्मा अमर आहे, तू युद्ध कर अशी आहे. ही मांडणी अत्यंत बिकट प्रसंगात सापडलेल्या माणसाचा पूर्ण गोंधळ उडवू शकते, तुमची आणि माझी काय कथा?
४) सगळं अध्यात्म फक्त दोनच पायऱ्यात एकवटलं आहे. एक निराकराचा (किंवा आत्म्याचा) बोध आणि दोन आपण निराकार आहोत हा बोध बास! यापलिकडे आख्या जगातल्या कुठल्याही धर्मात, पंथात किंवा प्रक्रियेत काहीही नाही आणि असेल तर ते सत्य न समजलेल्या व्यक्तीनी केलेलं निरूपण किंवा काढलेला अर्थ आहे त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि गोंधळ होतो.
५) आता निराकार एक आहे आणि तोच सगळ्या आकारांच्या आत आणि बाहेर आहे तर मग राज्य किंवा सत्ता ही मानवी कल्पना आहे आणि युद्ध हे सर्वथा निरार्थक आहे हे आगदी सरळ आहे. थोडे आणखी साकल्याने बघितले तर युद्ध ही फक्त मानवानी निर्माण केलेली कल्पना आहे आणि त्यात अपरिमीत हानी आणि नुकसान आहे शिवाय त्यातून काहीही निषप्न्न होत नाही, वैर तसेच रहाते. कोणताही सूज्ञ माणूस हे सहज कबूल करेल कारण खुद्द महाभारतातून देखील भारताची अपरिमीत हानी होण्यावाचून काहीही झालेले नाही. प्रत्येक युद्धाची तीच कथा आहे. पुढच्या पिढीला देखील वैरात लोटणे हा युद्धाचा आणखी एक अतिशय दुर्दैवी पैलू आहे.
यात आणखी एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो म्हणजे युद्ध ही नैसर्गिक आपत्ती किंवा नियती नाही, माणूस युद्ध न करायचं ठरवू शकतो.
६) आता तुमच्या प्रश्नांची उत्तरं : प्रथम 'नम्र विचारणा': युद्धाला प्रवृत्त करणं (२.३७) आणि निष्काम कर्म (२.४७) यात विरोधाभास नाही का? हो आगदी सरळ विरोधाभास आहे. एक : ज्याला आत्मा कळला तो दुसऱ्याला कधीही युद्धाला प्रवृत्त करणार नाही त्यामुळे २.३७ ला आपण पूर्ण आणि निःसंदेह नकार देऊ.
दोनः निष्काम कर्म : आत्मा किंवा निराकार हा फक्त असतो तो काहीही करत नाही थोडक्यात जे घडतं ते शरीर आणि मनाच्या पातळीवर असतं तुम्ही नेहेमी अकर्ताच राहता हा ज्याला आत्मबोध झाला त्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्याला कर्माचीच मजा येते आणि फलाची अपेक्षा राहत नाही. आगदी आता या क्षणी म्हणाल तर मी आगदी मनापासून लिहीतोय त्यामुळे मला लिहीण्याची मजा येते आहे, तुमचे प्रतिसाद येवोत न येवोत. या श्लोकानी लाखो लोकांचा हजारो वर्ष संभ्रम केला आहे आणि भारतात कर्माचे वर्गीकरण होऊन कर्माची अवहेलना झाली आहे, पराकोटीचा भ्रष्टाचार निर्माण झाला आहे आणि कर्माची मजाच निघून गेली आहे. चुकीची मांडणी किंवा चुकीचा अर्थ ध्वनीत करणारी मांडणी असे २.४७ बद्दल म्हणता येईल.
७) दहशतवाद आणि स्वधर्म : याचे ही उत्तर युद्धाचा परिणाम बघता हो असेच आहे. अनेक निरपराध लोकांचा नाहक बळी ज्याला आत्मा कळला आहे तो स्वधर्म काय कोणत्याही कारणासाठी जाऊच देणार नाही.
८) आता संपूर्ण निर्वैयक्तिकतेनी हे बघाः अशी कल्पना करा की एक निराकाराचा बोध झालेली व्यक्ती आहे (म्हणजे तिला हे कळलं आहे की सत्ता हा भ्रम आहे), दोन घराण्यात कमालीचा सत्ता कलह आहे, अनेक न सुटणारे प्रश्न आहेत आणि परोपरीनी समजावून सुद्धा युद्ध हा पर्याय एका घराण्यानी निवडला आहे, दुसऱ्या घराण्यातली अत्यंत मात्तबर व्यक्ती तुम्हाला विचारते की काय करायच? तुम्ही काय सांगाल? मी जर तिथे असतो तर संपूर्ण निसंदिग्धतेनी सांगीतलं असतं की काहीही झालं तरी युद्ध करायचं नाही कारण युद्धानी आज पर्यंत कोणताही प्रश्न सुटलेला नाही. त्यातूनही तुम्हाला फारच खुमखुमी वाटत असेल तर तुम्ही वन-टू-वन युद्ध करा म्हणजे ते तुमची व्यक्तीगत ताकत पणाला लावेल आणि मजा म्हणजे दोनचार जण गेल्यावर तुम्हाला तुमचा वेडेपणा लक्षात येईल! अशा युद्धात अर्जुनाचा किंवा भिमाचा हात धरणारं कोण होत? कशाला इतका संहार झाला असता? आणि आपण तरी कशाला हे अर्थ काढले असते? छान गाणी म्हंटली असती, खेळलो असतो, पोहोलो असतो, हिंडलो असतो, भरपूर जेवलो असतो आणि निवांत झोपलो असतो. असो, आता मी चहा घेतो.
संजय